मुंबई : जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहे. काश्मीरी विद्यार्थी हे देशाचे नागरिक असल्यामुळे त्यांचे संरक्षण करणे राज्य शासनाने कर्तव्य आहे. त्यांच्या संरक्षणासाठी पोलिसांना सूचना दिल्या असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.


अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्येला आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुलवामा हल्ल्यात राज्यातील बुलडाणा जिल्ह्यातील संजय राजपूत आणि नितीन राठोड हे दोन केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले आहेत. महाराष्ट्रातील जनता या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे. शहिदांचे मोल पैशात होणार नाही. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांचा निधी देण्यात आला आहे.

याबरोबरच या शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्यात येणार आहे. पूर्वी शहीदांच्या कुटुंबियांना 5 लाख देण्यात येत होते. ती रक्कम वाढवून 25 लाख करण्यात आली. आता त्यात आणखी वाढ करून राज्य शासन 50 लाख रुपये शहीदांच्या कुटुंबियांना देत आहे. राज्यातील नागरिकही स्वतःहून थेट तसेच राज्य शासनामार्फत मदत करत आहेत.

काश्मीरी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक पोलीस घटक प्रमुखांनाही या विद्यार्थ्यांच्या रक्षणासंदर्भातील योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.