मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टाने सरकारला फटकारलं नाही : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 13 Oct 2016 12:46 PM (IST)
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सरकारने वेळ मागितला नाही, याचिकाकर्त्यांनी मागितलं आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. हायकोर्टाने आम्हाला फाटकारलं नाही, याचिकाकर्त्यांनी वेळ मागितला आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सज्ज आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. अफवांवर विश्वास ठेवू नका, किमान कोर्टाचं खरं सांगत जा, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. यापूर्वीच मराठा आरक्षणावर आपण भूमिका मांडली आहे असं सांगतानाच आरक्षणाने सगळे प्रश्न सुटत नाहीत, असंही फडणवीस म्हणाले. सरकारी कॉलेज मध्ये मराठा समाजाला 900 जागा मिळतील, अशी माहिती त्यांनी दिली. मराठा संघटनांशी चर्चा झाली आहे, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चुकीच्या गोष्टी पसरवायच्या, भडकवणारी वक्तव्यं करायची, समाजात तेढ निर्माण करायची, हे योग्य नसल्याचंही ते म्हणाले. सरकार सर्व समाजाचा विचार करत आहे, त्यामुळे एका समाजाने दुसऱ्या समाजाविरुद्ध भूमिका घेऊ नये. आम्हाला शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा आहे. शाहू, फुले, आंबेडकरांना अपेक्षित असं वर्तन सगळ्यांकडून व्हावं, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं.