मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणाच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे शिंदे यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारही गुवाहाटीला जाणार असून दौऱ्याची तारीख ठरली आहे. 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री सर्व आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला  जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. दौऱ्याची तारीख निश्चित नव्हती अखेर आज दौऱ्याची तारीख समोर आली आहे.  21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री  सर्व आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे  जाणार आहे. गुवाहटीला  मुख्यमंत्री सर्व आमदारांसह  कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. कामाख्या देवीचे  दर्शन झाल्यानंतर एका खास पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्तांतरणाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी जी पूजा केली त्याच प्रकारची ही खास पूजा असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा एक दिवसीय हा दौरा आहे. गुवाहटीच्या  दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन असे सांगितले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे.  दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  गुवाहटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस कमिशनर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांना भेटणार आहेत.


 एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंडखोरी केली आणि तब्बल 40 शिवसेना आमदारांना घेऊन सत्तेबाहेर पडले. त्यांच्यासह मित्रपक्ष आणि अपक्ष  आमदारांनी देखील सत्तेतून काढता पाय घेतला होता. हे सर्व आमदार  गुवाहाटीच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते.  शिंदे गटाच्या या सर्व 50 आमदारांचा गुवाहाटी दौरा चांगलाच गाजला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतरच ते पुन्हा राज्यात आले होते.   एकनाथ शिंदेसह  आमदारांनी  शक्तिपीठ असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि तिथं पूजाही केली होती.  कामाख्या देवी ही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि तिचा प्रसाद भक्तांनी इच्छित फळ देतो असं मानलं जातं. त्यावेळी संजय राऊत यांनी कामाख्या देवीच्या दर्शनावरून टीका देखील केली होती.