CM Eknath Shinde : राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे (Farmers) दुःख कष्ट दूर करुन त्याला सुजलाम सुफलाम ठेव. त्याच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असं मागणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी श्री विठ्ठलाकडे मागितले आहे. तसेच राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढं मागणं विठुरायाच्या चरणी मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आज आषाढी वारीचा सोहळा आहे. यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाली, त्यानंतर ते बोलत होते.


माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा दिवस आहे. कारण सलग तिसऱ्या वर्षी मला श्री विठ्ठल रुक्मिणीची महापुजा करण्याचं भाग्य लाभल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सळीकडे भक्तीमय वातावरण झालं आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशिर्वादाने राज्याचा कारभार सुरु आहे. या राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याचं पिक चांगलं येऊ दे, चांगला पाऊस येऊ दे शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असं मागणं विठ्ठलाला मागितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वारकरी म्हणजेच शेतकरी, कष्टकरी, युवक, ज्येष्ठ यांच्या जीवनात सुखी समाधानाचे दिवस येऊ दे असं मुख्यमंत्री म्हणाले. 


तिरुपती बालाजीप्रमाणेच दर्शन मंडप आणि टोकन पध्दत सुरु होणार, सरकार देणार 103 कोटी रुपये 


दरम्यान, तिरुपती बालाजीप्रमाणेच दर्शन मंडप आणि टोकन पध्दत सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे 103 कोटी सरकार देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यामुळं वारकऱ्यांना 12 ते 15 तास दर्शनाला रांगेत उभा राहावं लागणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या दर्शनासाठी एक रुपयाही मंदिर समिती घेणार नाही असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 


मी समाधानी, मुख्यमंत्री असताना पंढरपूरमध्ये अनेक कामं करता आली


आज मी समाधानी आहे. कारण मी मुख्यमंत्री असताना पंढरपूरमध्ये अनेक कामं करता आली. मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विकास करत असताना कोणालाही नाराज करायचे नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. आपलं शासन हे सर्वसामान्याचं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. रस्ते पाणी, दिवाबत्ती याचीही कामं होतील असे मुख्यमंत्री म्हणाले. विकासकामात आम्ही कुठेही कमी पडणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वांना आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न, विठुनामाच्या गजरात पंढरी दुमदुमली