पुणे :   डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षि शाहू महाराज एकत्र होते तर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत का? असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले.  संभाजीराजे छत्रपती (SambhajRaje Chhatrapati) यांनी आज मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते. (Chhatrapati sambhaji raje meets Prakash Ambedkar to discuss Maratha reservation issue in Pune)


संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, या विषयावर दिल्लीत गोलमेज परिषद घेणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदारांना आमंत्रित करणार आहोत, असं ते म्हणाले.  विनायक मेटे यांच्या पाच तारखेच्या मोर्चाबद्दल बोलताना ते म्हणाले की, आत्ता कोणीही समाजाला वेठीस धरु नये. 


महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आलाय, संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर दूर होईल : प्रकाश आंबेडकर 
महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला तर हा शिळेपणा दूर होईल, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.  प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षणासाठी परिस्थिती खूप प्रतिकूल आहे.  पण आम्ही प्रयत्न करणार आहोत.  


ते म्हणाले की, चर्चेच्या दरम्यान असं ठरलं की आरक्षणाचा प्रश्न पुढं घेऊन जायचा असेल सत्तेचा गाभा असायला हवा. आरक्षणाचे पुरावलोकन करायचं असेल तर पुनर्विचार याचिका करता येते पण राज्यसत्ता असेल तर राज्यपालांच्या माध्यमातून देखील आपण पुनरावलोकन करु शकतो. त्यासाठी राज्यसत्ता हवी. राज्यसत्तेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. आरक्षणासाठी परिस्थिती खूप प्रतिकूल आहे.  पण आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं ते म्हणाले. 


"सहा जूनपर्यंत आरक्षणासंदर्भात भूमिका घ्या,अन्यथा रायगडावरुन आंदोलन करू", खासदार संभाजीराजेंचा इशारा


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवारांचे राजकारण नेहमी नरो वा कुंजरोवा अशाप्रकारचे राहिले आहे. पण शरद पवार इथून पुढे स्पष्ट भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे. ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा आज आलेला निर्णय कायदेशीर आहे असं मी मानत नाही, असं ते म्हणाले.  ओबीसी आरक्षण अझम्शन बेस्ड आहे, असंही ते म्हणाले.