कार्यकर्त्यांनी मुंबईत येण्याची घाई करु नये, भुजबळ कुटुंबीयांचं आवाहन
एबीपी माझा वेब टीम | 05 May 2018 07:56 PM (IST)
कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करु नये, किंवा मुंबईत येण्याची घाई करु नये, असं आवाहन भुजबळ कुटुंबीयांकडून करण्यात आलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सर्वात अगोदर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशा कार्यक्रमाचा मेसेज व्हायरल झाला होता. मात्र असा कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजि करण्यात आला नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. छगन भुजबळांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेत सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भायखळा भाजी मंडई येथे उपस्थित रहावे, छगन भुजबळ सर्वांना संबोधित करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिल्याचा हा मेसेज होता. मात्र असं काहीही नसल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. भुजबळ कुटुंबीयांचं आवाहन कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करु नये, किंवा मुंबईत येण्याची घाई करु नये, असं आवाहन भुजबळ कुटुंबीयांकडून करण्यात आलं आहे. भुजबळ साहेब भेटण्यासाठी नंतर वेळ देतील, मात्र आत्ताच घाई करु नये, असं भुजबळ कुटुंबीयांनी म्हटलं आहे. सोमवारपासून पुन्हा मैदानात सोमवारपासून छगन भुजबळ पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. मुंबईतल्या केईएम रुग्णालयात कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी भुजबळांची भेट घेत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळांची भेट घेतली. भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. मात्र चर्चेचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. काही दिवसांवर आलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका, आगामी विधानसभा आणि लोकसभांची रणधुमाळी या पार्श्वभूमीवर भुजबळांना मिळालेल्या जामिनावर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. जामिनानंतर भुजबळ सध्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संबंधित बातम्या :