मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि पुलांच्या दुरुस्तीचे काम 15 ऑगस्टपर्यंत करा, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.


विशेष म्हणजे पुढील पावसाळी अधिवेशनात मुंबई-गोवा महामार्गाचा विषय पुन्हा येणार नाही, त्याआधीच काम पूर्ण करु, असेही पाटील म्हणाले.

तसेच, गणेशोत्सव काळात पुणे-कोल्हापूर महामार्गावर टोल घेतला जाणार नाही, याची दक्षता घेणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

“मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमय झाले आहे. गणेशोत्सव जवळ येत आहे. रस्ता खराब झाल्याने लोकांना त्रासदायक ठरत आहे, असे आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले.

त्यानंतर अनिकेत तटकरे यांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ पुढील काम सध्याच्या कंत्राटदाराऐवजी नवीन कंत्राटदार नेमला जाईल. मे 2020 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गवरील ब्रीजचे काम केले जाईल.”

तसेच, “खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील पावसाळी अधिवेशनास मुंबई-गोवा महामार्ग विषय संपेल, यावर प्रश्न विचाराची गरज पडणार नाही.”, असेही चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिले आहे.