पदवीधर निवडणूक ही देखील निवडणूक असते. यासाठी 5 जिल्हे, 58 विधानसभा आणि 10 लोकसभेचे कार्यक्षेत्र असते, हे शरद पवार विसरले आहेत काय असे खोचक उत्तर पाटील यांनी पवारांना दिले.
पक्षाने आदेश दिल्यास आपण विधानसभाच काय लोकसभा देखील लढवू, असे सांगत सध्या पवारांकडून होत असलेली टीका ही 23 मे जवळ येऊ लागल्याने होत असल्याचेही पाटील म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीसह सर्व 10 जागा आम्ही जिंकणार असून पवारांना याचा अंदाज आल्यानेच बारामती हरली तर EVM मशीनमुळे हरेल, ही भाषा सुरु झाल्याचा टोला पाटील यांनी लगावला .
मंगळवेढा तालुक्यातील छावण्यांची पाहणी
दरम्यान, चारा छावण्यात शेतकऱ्यांशी चर्चा केल्यावरच जनावरांच्या चाऱ्यात 3 किलोची वाढ केली असून आता पेंडही रोज 1 किलो देणार असल्याचे त्यांनी सांगितले. चारा छावण्यांच्या अनुदानातही 15 ते 20 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार असून येथील जनावरांच्या मागे थांबलेल्या लोकांना काय काम देता येईल यावरही विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या रोजगार हमी योजनेतून 5 लाख मजूर कामावर असून अजून 5 लाख मजुरांचे काम तयार असले तरी लोक कामाला मिळत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
पाटील यांनी सांगोला मंगळवेढा तालुक्यातील छावण्यांची रात्री उशिरापर्यंत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री विजय देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, शहाजीबापू पाटील उपस्थित होते.