राज्यभरात चोऱ्या, घरफोड्या करुन धुमाकूळ घालणारी चड्डी-बनियान गँग गजाआड
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2017 10:29 AM (IST)
कोल्हापूर : मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात घरफोड्या करणाऱ्या चड्डी बनियान गँग जेरबंद करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आल आहे. या टोळीने सहा महिन्यात कोल्हापूर जिल्हयात 60 घरफोड्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. तर संपूर्ण राज्यभरात 400 घरफोड्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. चड्डी-बनियान गँग नावाने ही टोळी उस्मानाबाद जिल्हयातील इटकूर यागावची असून, यातील चौघांना अटक केली आहे. तर टोळीचा म्होरक्या विलास छना शिंदे याच्यासह सहाजण फरार आहेत. अटक केलेल्या चौघांकडून अमेरिका, सिंगापूर, भूतान, चीन आणि थायलंड या देशांचे चलन सापडले आहे. तसेच 1 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या टोळीनं 1 नोव्हेंबर 2016 पासून ते मे 2017 या कालावधीत कोल्हापूर जिल्हयात सुमारे 50 हून अधिक घरफोड्या झाल्या होत्या. गेल्या महिन्यात न्यू कणेरकर नगरात तब्बल 11 घरफोड्या झाल्या. या घरफोड्यांमुळे नागरिक त्रस्त होते. याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विविध पथके स्थापन केली होती. उस्मानाबाद जिल्हयातील एका विशिष्ट समाजाचे लोक असे प्रकारचे गुन्हे करण्यात तरबेज असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याप्रमाणे उस्मानाबाद येथे पोलिसांच्या पथकाने तळ ठोकून इटकूर येथील एका वसाहतीवर छापा टाकला. यावेळी संशयित दत्ता काळे, रामेश्वर शिंदे, राजेंद्र काळे व अनिल काळे या चौघांना ताब्यात घेतलं. दरम्यान, या टोळीने राज्यभरात 400 हून अधिक घरफोड्या केल्याचा संशय असून, इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आहे.