यवतमाळ : यवतमाळ-वर्धा सीमेवरील येवती गावाजवळ वर्धा नदीच्या पुलावरुन महिंद्रा एक्सयूव्ही कार कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे. तिरुपतीहून देवदर्शनानंतर जबलपूरला जात असताना हा अपघात झाला आहे.


यवतमाळच्या येवती गावाजवळ असलेल्या पुलाचे कठडे तोडून कार खाली कोसळली. 85 फूट उंचावरून महिंद्रा एक्सयूव्ही गाडी नदीत कोसळल्यानंतर गाडीतील मनमोहन सिंह गील, त्यांची पत्नी दलबीर कौर यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा राजवीरसिंग हा गंभीर जखमी झाला आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेले मनमोहन सिंह गील हे निवृत्त पोलीस अधीक्षक असून ते जबलपूर येथे वास्तव्य करतात. गील कुटुंब तिरुपतीहून परतत असताना हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर तातडीनं वडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत आणि जखमीला वर्ध्याच्या वडणेर येथील रुग्णालयात हलवलं आहे.