सांगली : "हिंमत असेल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आगामी निवडणुकांमध्ये वेगवेगळे लढून दाखवावं," असे आव्हान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिले आहे. आज सांगलीत आयोजित एका सभेत चंद्रकांत पाटील बोलत होते.


चंद्रकांत पाटील म्हणाले की, कितीही भांडणे असली तरी भाजपला इतर पक्षांना एकत्र येऊन लढावे लागते, यातच भाजपचा विजय आहे. असे बोलून पाटील यांनी भाजप-शिवसेनेच्या युतीचे संकेत दिले आहे.

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप शिवसेना वेगवेगळे लढले होते. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही वेगवेगळे लढले होते. आगामी निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती होणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युतीदेखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आगामी निवडणुकांमध्ये वेगवेगळे लढून दाखवण्याचे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही पक्षांना दिले आहे.

दरम्यान भाजप-शिवसेना युतीबाबत बोलताना पाटील म्हणाले की, केवळ राज्यात युतीचे सरकार टिकावे यासाठीच मुंबईत भाजपचा महापौर झाला नाही. नाहीतर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर झाला असता.