कोल्हापूर : प्राणी आपल्या मालकांवर कसा जीव ओवाळून टाकतात याची उदाहरणं आपण सिनेमाच्या माध्यमातून बऱ्याचदा पाहतो. मात्र कोल्हापूर अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सातवे येथील वारणा नदीच्या काठावर आपल्या बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या महेश सर्जेराव काटे यांच्यावर मगरीने हल्ला केला. मात्र या हल्ल्यातून महेश यांच्या बैलानेच त्यांचे प्राण वाचवले. त्याचे झाले असे की दुपारच्या वेळी महेश आपल्या बैलांना घेऊन नदीकडे गेले होते. त्यावेळी पाण्यात उतरलेल्या महेश यांच्या पायाला मगरीने पकडले. मगरीचा चाव्यातून महेश यांचा पाय निघत नव्हता. त्याच वेळी बैलाचा कासरा महेश यांच्या हातात होता.


बैलाने नदीच्या बाहेर ओढल्यामुळे महेश यांचा पाय मगरीच्या तावडीतून सुटला. बाहेर आल्यानंतर महेश यांनी आरडाओरड केली. त्यावेळी त्याठिकाणी इतर शेतकरी गोळा झाले. त्यानंतर महेश यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोल्हापूर महापालिकेची भन्नाट आयडिया, स्वीगी, झोमॅटोला 'असा' दणका

मगरीच्या हल्ल्यामुळे महेशच्या डाव्या पायाच्या घोट्या जवळील संवेदनशील नसा तुटल्यामुळे त्याला चार महिन्यांपर्यंत उपचार घ्यावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महेश यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे उपचारासाठी होणारा प्रचंड खर्च पेलणारा नाही. त्यामुळे वन विभागाकडून आर्थिक मदत, नुकसानभरपाई मिळणे आवश्यक असल्याची नातेवाईकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Special Report | शेतकरी नवराच हवा...! उच्चशिक्षित तरुणीकडून शेतकरी मुलाची निवड