Swabhimani Shetkari Saghtana : अतिवृष्टीनं झालेल्या शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळावा यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana ) वतीनं बुलढाण्यात (Buldhana) 'एल्गार मोर्चा' काढण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला राज्याच्या विविध जिल्ह्यातून 30 ते 40 हजार शेतकरी येणार असल्याची माहिती तुपकारांनी दिली आहे. दुपारी 12 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून, एक वाजता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.


परतीच्या पावसाचा पिकांना फटका


आज होणाऱ्या 'एल्गार मोर्चा'साठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मोठी तयारी केली आहे. विदर्भातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी हा मोर्चा महत्त्वाचा मानला जात आहे. परतीच्या पावसानं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यांची उभी पिकं वाया गेली होती. शेतकऱ्यांची हाती येणारी पिकं वाया गेल्यानं राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची पिकं या पावसाच्या फटक्यातून वाचली आहे, त्या पिकांना योग्य दर मिळावा, यासाठी आजचा एल्गार मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांनी संवाद साधला आहे. मोठ्या प्रमाणावर जागृती केली आहे. त्यामुळं मोठ्य संख्येनं शेतकरी या मोर्चात सामील होण्याची शक्यता आहे.


पाठीशी भक्कम उभे राहण्यासाठी मोर्चात सामील व्हा


दरम्यान, शहरातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, नोकरदार, व्यापारी, विचारवंत, साहित्यिक, दुकानदार अशाच सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी बळीराजाच्या पाठिशी उभं राहावं असे आवाहन रविकांत तुपकरांनी केलं आहे. आपल्या ताटातला अन्नाचा कण अन्  कण शेतकऱ्याच्या घामाने पिकला आहे. शेतकऱ्यांनी अन्न पिकवणे बंद केलं तर आपण काय खाणार? अजून तरी टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यांमध्ये अन्न निर्मितीची सोय झालेली नाही. अन्नधान्य निर्मितीचे तंत्रज्ञान विकसितच झालेलं नाही. शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या अन्नाशिवाय आपण जगूच शकत नाही आणि देश सुद्धा टिकू शकत नाही, असे तुपकर म्हणाले. बळीराजाची फौज आपल्या घामाचे दाम मागण्यासाठी मोठ्या संख्येनं बुलढाण्यात दाखल होत आहे. राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात ही आपल्या बुलढाण्यातून होत आहे. या बळीराजाच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी, त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्यासाठी आणि त्यांना सहानुभूती देण्यासाठी या 'एल्गार मोर्चा'त आपण सहभागी व्हावं, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून धार द्या. तुम्हा शहरवासीयांच्या आधाराची शेतकऱ्यांना प्रचंड आवश्यकता असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.