नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या 60 हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस म्हणजेच स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी अर्ज केला आहे. दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांनीच याबाबत माहिती दिली. स्वेच्छानिवृत्ती पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये 57 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत.


सध्या 55 वर्षे वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच पेन्शन मिळेल. 4 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या काळात निवृत्ती घेता येईल. स्वेच्छानिवृत्ती 31 जानेवारी 2020 पासून लागू होईल, अशी माहिती बीएसएनएलकडून देण्यात आली आहे.

बीएसएनएलने विभाग ही योजना जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरुन कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती मिळेल. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बीएसएनएल आणि एमटीएनएलचं विलिनीकरण होणार आहे. या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाबरोबरच कामगारांच्या स्वेच्छानिवृत्तीची योजनाही आखण्यात येत असल्याचं दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.

आगामी काळात 4 वर्षात 38000 कोटी रुपये मोनेटाइज करण्यात येणार आहे. तसेच 15 हजार कोटींचे बाँड जारी करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं.