Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Breaking News LIVE Updates, 08 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Oct 2021 06:47 AM
राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट कोळश्याअभावी बंद

राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट कोळश्याअभावी बंद. कोयना आणि इतर 12 होयड्रो प्रकल्प हे पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय. त्यामुळे विज निर्मितीची भरपाई होईल. जर हीच परिस्थिती राहीली तर शहरी/ग्रामिण भागात आठ तासाचे लोडशेडींग करावे लागेल : महावितरण.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची औरंगाबादमध्ये मोठी कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाने औरंगाबादमध्ये मोठी कारवाई केली आहे. दहा लाखांपेक्षा अधिक रुपयांची देशी-विदेशी कंपनीचा अवैध पद्धतीने विक्रीस आणलेला दारूचा साठा जप्त केला आहे. तेलंगाना राज्यात विक्रीसाठी असलेला दारूसाठा थेट महाराष्ट्रात आला असता राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करून सदरील कारवाईतील दोषी आरोपीस ताब्यात घेतले आहे. यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जातेय.

लखीमपूर हिंसाचाराला हिंदू विरुद्ध शीख युद्धात बदलण्याचा डाव : वरुण गांधी

भाजपचे खासदार वरुण गांधी गेल्या काही काळापासून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि आता लखीमपूर हिंसाचारावरुन टीका करतायत. आता पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून वरुण गांधी यांनी गंभीर आरोप केलाय. लखीमपूर हिंसाचाराला हिंदू विरुद्ध शीख युद्धात बदलण्याचा डाव आहे असा आरोप वरुण गांधी यांनी केलाय. क्षुल्लक राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रीय एकतेला धोका पोहोचवू नये असंही वरुण गांधी यांनी म्हटलंय. वरुण गांधी आणि त्यांच्या मातोश्री मनेका गांधी यांना भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिलेले नाही. असं असतानाही वरुण गांधी यांनी शेतकऱ्यांबाबतची आपली भूमिका कायम ठेवलीय. 


बायोडिझेलच्या पेट्रोल पंप ऐजंशी देण्याच्या नावा खाली पंधरा लाख रुपयाची फसवणूक

हिंगोली : जिल्ह्यातील कुरुंदा येथील मुंजाजी इंगोले यांना एका खासगी कंपनीने बायोडिझेलच्या पेट्रोल पंप एजन्सी देण्याच्या नावाखाली पंधरा लाख रुपये घेत फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. 


संबंधित खाजगी कंपनीचे मॅनेजर असल्याचे आरोपींनी सांगितले आणि इंगोले यांना पंधरा लाख रुपये भरल्यानंतर तुम्हाला बायोडिझेल च्या पेट्रोल पंप एजन्सी देऊ, असे आश्वासन दिले. त्यावर इंगोले यांनी त्वरित पंधरा लाख रुपये कंपनीच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात पाठवले आहे. परंतु नंतर कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे मुंजाजी इंगोले यांच्या लक्षात आले आहे. त्यावरून त्यांनी पोलिसात तक्रार देत कुरुंदा पोलिसात 9 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे अधिक तपास पोलीस करत आहेत. 

परतीच्या पावसाने उजनी धरणाला दणका, 20 हजार क्युसेक निसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात, पुराचा धोका नसला तरी नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा

संपूर्ण पावसाळा हंगामात धारण कधी भरणार याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने मोठा दिलासा दिला असून धरणात 109 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाल्याने उजनी धरणातून आज सकाळी 8 वाजता 20 हजार क्युसेक विसर्गाने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे . गेल्या दोन दिवसापासून उजनीचे पाणलोट क्षेत्र असलेल्या दक्षिण नगर भागातील श्रीगोंदा , कुकडी आणि धोड परिसरात पावसाची जोरदार धुमशान असल्यानेपाणी सध्या पारनेर येथे 12700 क्युसेक विसर्गाने पाणी उजनी धरणाकडे येत आहे . याशिवाय पुणे आणि सोलापूर भागातील बॅकवॉटर परिसरात देखील जोरदार पाऊस झाल्याने मोजमाप न होणार हजारो क्युसेक पाणी उजनीत जमा होऊ लागल्याने उजनीचे पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे . यातच इंद्रायणी परिसरातही मोठा पाऊस झाल्याने हाही मोजदाद न होणार विसर्ग उजनीत मिसळत असल्याने उजनी धरणातून काल रात्री नऊ वाजता 5 दरवाज्यातून 5 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात केली . यानंतर रात्री 10 वाजता अजून3 दरवाजे उघडून विसर्ग 10 हजार करण्यात आला तर आज सकाळी 8 वाजता हा विसर्ग 20 हजार क्युसेक करण्यात आला आहे . याचवेळी वीर धरणातूनही 4600 क्युसेक विसर्गाने पाणी नीरा नदीत सोडण्यात येत असल्याने नीरा नरसिंगापूर जवळ भीमा नीरा संगमापाशी नदी 25 हजार क्युसेक निसर्गाने वाहत आहे . पंढरपूर मध्ये सध्या नदी 13800 क्युसेक निसर्गाने चंद्रभागा वाहत असून दुपारीपर्यंत नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे . सध्याच्या स्थितीत पुराचा अजिबात धोका नसला तरी पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने नदीकाठच्या लोकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. 

सलग चौथ्या दिवशी अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्या, कारखान्यांवर आयकर विभागाची छापेमारी

अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या काही कंपन्या आणि कारखान्यांची आयकर विभागाकडून सुरु असलेली छापेमारी चौथ्या दिवशीही सुरुच आहे. तर काही कंपन्यांची चौकशी तूर्तास थांबवण्यात आली आहे. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याची चौकशीही आजही सुरुय. तर तिकडे बारामतीतल्या डायनामिक्स डेअरीत सलग चौथ्या दिवशी आयकरचे अधिकारी ठाण मांडून बसलेत. दरम्यान अजित पवारांच्या दोन बहिणी डॉक्टर रजनी इंदुलकर आणि नीता पाटील यांच्या घरी आयकर विभागानं सुरु केलेली चौकशी थांबवण्यात आली आहे. पार्थ पवारांचे निकटवर्तीय सचिन शिंगारेंचा कारखाना आयान मल्टीट्रेडसंदर्भात देखील आयकरनं चौकशी तूर्तास थांबवली आहे.

मुंबई पोलिसांचं सीबीआय संचालक सुबोध जैस्वाल यांना समन्स

Subodh Jaiswal : केंद्र विरुद्ध राज्य सरकार वाद आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. कारण आता मुंबई पोलिसांनी थेट सीबीआय संचालक सुबोध जैस्वाल यांनाच समन्स पाठवलंय. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात ऑफिशिअल सीक्रेट अॅक्ट उल्लंघनाप्रकरणी सुबोध जैस्वाल यांना समन्स पाठवण्यात आलं आहे. 14 ऑक्टोबरला सुबोध जैस्वाल यांनी हजर राहवं असं, समन्स मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं बजावलं आहे. रश्मी शुक्ला यांनी अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणाशी संबंधित रेकॉर्डिंग केल्या होत्या आणि त्याचा एक अहवाल देखील तयार केला होता. जो मीडियासमोर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता. पण हा रिपोर्ट लीक झाल्याचा म्हटलं गेलं होतं आणि याच प्रकरणात आता मुंबई पोलीसांच्या सायबर सेलनं चौकशीला सुरुवात केली आहे. ईमेलद्वारे पाठवलेली ही नोटीस अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत पाठवण्यात आली आहे. 

लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्रात बंद

लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे. या संदर्भात काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली... कायदा चिरडला जातो, गुन्हेगारांना मोकाट सोडलं जातं हे सर्व देशातील जनतेनं पाहिलं त्यामुळे या बंदमध्ये लोक स्वत: सहभागी होतील असं राऊत यांनी सांगितलं.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे चिरंजीव आशिष मिश्राला अटक

लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे चिरंजीव आशिष मिश्राला अटक करण्यात आलीय. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटीनं ही कारवाई केलीय..तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर आशिष मिश्राला अटक करण्यात आलीय. लखीमपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आशिष मिश्रावर आरोप आहे. या प्रकरणात आशिष मिश्रा मुख्य आरोपी असून सहा दिवसांनी तो पोलिसांसमोर हजर झाला होता.

पार्श्वभूमी

Ashish Mishra Arrested: 12 तासांच्या चौकशीनंतर मुख्य आरोपी आशिष मिश्राला अटक, तपासात सहकार्य करत नसल्याची पोलिसांची माहिती


Lakhimpur Violence Case: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. आशिष मिश्रा यांची एसआयटी टीमने सुमारे 12 तास चौकशी केली. सखोल प्रश्नोत्तरानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी सांगितले की, आशिष मिश्रा तपासात सहकार्य करत नाहीत. त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.


आशिष मिश्रा शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास गुन्हे शाखा कार्यालयात हजर झाले होते. एसआयटीने आशिष मिश्रा यांना तीन डझनहून अधिक प्रश्न विचारले. यूपी पोलिस डीआयजी उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले की, आशिष मिश्रा यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, असे उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले.


एनसीबीने ज्यांना सोडलं त्यात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा जवळचाही एक माणूस होता :  देवेंद्र फडणवीस


नागपूर : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवरुन महाराष्ट्रात राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझवरील कारवाईत काही जणांना सोडल्याचा आरोप केला होता. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. ज्यांना सोडलं त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक जवळचा माणूस होता. त्याचं नाव आम्ही घेत नाही कारण की तो क्लीन होता. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. यासाठी कोणती एजन्सी काम करत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. हा कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही, हा समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. 


Maharashtra Corona Update : राज्यात काल दिवसभरात 2446 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2486 रुग्ण कोरोनामुक्त


मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2 हजार 446 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 486 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 99 हजार 464 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. 


दरम्यान, राज्यात आज 44 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. हिंगोली, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, या पाच जिल्ह्यांमध्ये आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.  राज्यात सध्या कोरोनाचे 33 हजार 6 सक्रीय रुग्ण आहेत. 


पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 422  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (16), नंदूरबार (5),  धुळे (8), जालना (60), परभणी (89), हिंगोली (19), नांदेड (08),  अकोला (26), वाशिम (05), बुलढाणा (09), नागपूर (82), यवतमाळ (06),  वर्धा (3), भंडारा (1), गोंदिया (3), गडचिरोली (14) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.