धुळे : राज्यातील जनतेला हेच सरकार आपल्या अपेक्षा पूर्ण करेल असं वाटतं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत युतीचं सरकार सत्तेत येईल असं मतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला गुरुवारपासून सुरुवात झाली.


भाजपच्या महाजनादेश यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आमच्या यात्रेनंतर अनेक पक्षांना उत्साह आला आहे आणि त्यांनी देखील यात्रा काढल्या आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. तसेच काँग्रेसची भ्रष्टाचाराची जत्रा निघाल्यामुळे त्यांची यात्रा आहे की नाही मला माहिती नाही असही मुख्यमंत्री म्हणाले.

VIDEO | खासदार उदयनराजे मुख्यमंत्र्याच्या भेटीला, भाजपप्रवेशाची चर्चा | एबीपी माझा



विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महाजनादेश यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही यात्रा आतापर्यंत 43 विधानसभेत पोहोचली आहे. मुख्यमंत्र्यांची ही यात्रा धुळ्यानंतर जळगावच्या दिशेने रवाना होणार आहे. महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा 13 ते 19 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. या टप्प्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा समावेश असल्याची घोषणा मुख्यममत्र्यांनी केली आहे. तसेच या महाजनादेश यात्रेचा समारोप सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मिळतेय.

सध्या देशात पहिल्या तीन क्रमांकामध्ये महाराष्ट्राचा समावेश असून येणाऱ्या काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचाही निर्धार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.  आत्तापर्यंत जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून 240 कोटींची कामे झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर 10 हजार कोटी पेक्षा अधिक मदत खान्देशातील शेतकऱ्यांना मदत दिल्याचंही कबूल केलं.

मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्राच्या सामंजस्य कराराचा (MOU) कन्वर्जन रेट 54 ते 60 टक्के आहे. देशातील सामंजस्य कराराच्या कन्वर्जन रेटपेक्षा आपला रेट जास्त असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच मोटार उद्योगात आलेल्या मंदीच्या संकटावर केंद्र सरकार लक्ष ठेऊन आहे. निश्चित यावर तोडगा काढला जाईल असेही ते म्हणाले.

CM PC | पूरग्रस्त भागासाठी केंद्र सरकारकडे 6 हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद | ABP Majha



महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने विशिष्ट काळात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सरकारकडून निश्चित योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं.