Narayan Rane : मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपाऱ्या दिल्या. ज्यांना त्यांनी सुपाऱ्या दिल्या त्यांनीच मला सांगितलं, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. नारायण राणे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचा बचाव केला. नक्षलवाद्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना मारायची सुपारी दिली होती. रमेश मोरे ची हत्या कुणी केली? माझी पण सुपारी दिली होती, पण मी सुदैवाने वाचलो, अशी टीका नारायण राणे यांनी केली. 


वारसा रक्ताने नव्हे विचाराने मिळतो. शिवसेनेत असताना आई-वडिलांचं ऐकलं नाही. पण बाळासाहेब ठाकरेंचं ऐकलं, असं उत्तर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत हिंमत असेल तर आपल्या आई वडिलांचे फोटो वापरा, माझ्या वडिलांचा फोटो का वापरता? असा सवाल बंडखोरांना केला होता. यावर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. शिवाय, अडीच वर्षात काय केलं? तेव्हा मराठी माणूस, हिंदुत्व आठवलं नाही का? असा सवाल केला.


सत्तेतून बाहेर पडल्यावर यांना हिंदुत्व, मराठी माणूस आठवतोय. सत्ता गेल्यानंतर जळफळाट आणि केविलवाणी व्यथा आहे. मुख्यमंत्री पद गेल्यानं उद्धव ठाकरेंची ही अवस्था झाली आहे. या व्यक्तीला मी 40 वर्ष ओळखतो, अंगात खोटेपणा, कपटीपणा, द्वेष आहे, अशी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 


माननीय उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री यांच्या तुफानी मुलाखतीवर प्रेस घेतोय. संजय राऊत यांनी आधीच उत्तरं सांगितलेली होती, अशी त्यांची मुलाखत होती, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.  आजारपण आणि मातोश्री यातच मुख्यमंत्री पदाची कारकीर्द गेली. आता स्वतःचं पद एकनाथ शिंदे यांना मिळालं याच्या पोटशुळातून त्यांनी मुलाखत दिली, असे राणे म्हणाले.  आता संजय राऊत मनातून खुश आहे. माझ्या गुरूंनी, शरद पवारांनी सोपवलेलं काम फत्ते केलं, अशी टीका राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली. 


नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे...
अडीच वर्षात जनतेसाठी काहीच केलं नाही
मातोश्रीबाहेरील कुणालाच प्रेम आणि विश्वास दिलं नाही.
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना मुलाखत घ्यायला सांगितली. 
मला मारण्यासाठी ठाकरेंनी सुपाऱ्या दिल्या. ज्यांना सुपाऱ्या दिल्या त्यांनीच मला सांगितलं. 
अडीच वर्षात मराठी माणसासाठी काहीच केले नाही. 
अडीच वर्षात काय दिवे लावले?
 एक डझन आमदार आणि पाव डझन खासदार राहिले
दुखणी होती तर मुख्यमंत्री का झाले?
आमदार शिंदेंच्या प्रेमापोटी गेली. 
यांनी जे दिलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी दिलं...प्रेम, विश्वास, दु:खात समरस झाले शिंदे. 
संजय राऊत जोकर आहे, पत्रकार नाही. संजय राऊत यांची राज्यभर चेष्टा होतेय. 
अडीच वर्षांत उद्धव ठाकरे फक्त तीन तास मंत्रालयात आले होते. 
दुसऱ्या मातोश्रीचा भविष्यकाळ आजपासून सुरु झाला आहे. 
एकनाथ शिंदे यांचं नगरविकास खातं आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे चालवायचे.
उद्धव ठाकरे खोटारडे आणि कपटी आहेत. 
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कोणत्याही दंगलीमध्ये नव्हते, त्यांनी कुणालाही मदत केली नाही. 
उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत जनतेचं हित कुठे? 
काय अवस्था झाली आहे शिवसेनेची? 
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कोणत्याही दंगलीमध्ये नव्हते, त्यांनी कुणालाही मदत केली नाही. आता शाखा शाखात जाऊन जनतेला साद घालतायत. 
संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना भडकवण्याचं काम करतायत.
संजय राऊत हे ठाकरेंना आपल्या तालावर नाचवतायत. 
सत्ता गेल्याने संजय राऊत मनातून खूश आहेत. पवारांच्या सूचनांप्रमाणे राऊतांनी काम फत्ते केलं. 
पुढच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पाच आकडा सुद्धा दिसणार नाही. 
बाळासाहेबांचा फोन आला होता त्याचा किस्सा नारायण राणेंनी सांगितला....मी वाईट नजरेने पाहणार नाही असं वचन दिलं... उद्धव ठाकरेंनी सुपारी देऊनही मी शांत राहिलो.