नागपूर : नरेंद्र मोदी खासदारांचं म्हणणं ऐकून घेत नाहीत, नेत्यांचा सार्वजनिक रितीनं अपमान करतात अशा बातम्या आल्यानं चर्चेत आलेले खासदार नाना पटोलेंनी आज एबीपी माझाशी मनमोकळी बातचित केली. चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणं म्हणजे पक्षाला विरोध नव्हे, अशा शब्दात नाना पटोलेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.


तसेच सध्या राज्यातले अनेक आमदार, खासदार, मंत्री खासगीत मला त्यांच्या सुख दु:खाच्या गोष्टी सांगतात. माझ्या गोंदियातील भाषणानंतर त्यांनी आपलं मन माझ्याजवळ मोकळं केल्याचं सूचक वक्तव्यही नाना पटोले यांनी यावेळी केलं आहे.

देशातील समस्या मांडताना तुमची काय अडचण होत आहे ?


नाना पटोले : ज्या पद्धतीनं आज राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यातच माझा धर्म आणि जात शेतकरी आहे. त्यामुळे जिथं शेतकऱ्यावर अन्याय होत असेल, तिथं मी सत्तेत असताना मला चिड येत आहे. शेतकऱ्यांबद्दलची तळमळ लोकसभेच्या पटलावर मांडतो. राज्याच्या संदर्भातील प्रश्न मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना सांगतो. पण हे सर्व सांगितल्यानंतरही त्यावर योग्य ती कार्यवाही होत नसल्याचं सध्या दिसतं आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी आज राज्यात ऑनलाईन फॉर्म भरुन मागवले जात आहेत. पण ही पद्धत चुकीची असल्याचं वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगितलं. पण मुख्यमंत्र्यांनी ती पद्धत तशीच चालू ठेवली. याशिवाय, राज्य सरकारनं हंगामाच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याला 10 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं. पण अद्याप एकाही शेतकऱ्याला त्यातले पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे अशा अनेक समस्या राज्यात आव असून उभ्या असताना, त्यावर बोलणं म्हणजे पक्षविरोधी असल्याचं मी मानत नाही.

पक्षात लोकशाही नसल्यानं, तुम्हाला तुमची मतं अशाप्रकारे मांडावी लागत आहेत का?


नाना पटोले :  मत मांडण्याचे अधिकार सर्वांनाच आहेत. मी ज्या कार्यक्रमात माझी रोखठोक मतं मांडली, त्या कार्यक्रमाचा विषयच मुळी सिंचन आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू असा होता. अन् मी यावेळी बोलताना गेल्या 10 वर्षातील शेती क्षेत्रातील काम, आणि सध्याच्या घडीला काय होत आहे, यावरुन विश्लेषण केलं. याद्वारे सध्याच्या सरकारमध्ये काय चालू आहे, हे जनतेसमोर मांडलं. एक हे लोकप्रतिनिधीचं काम म्हणून मी हे सर्व केलं आहे. यावरुन जर मला पक्षश्रेष्ठींनी (अमित शाह आणि मोदी) मला विचारलं, तर मी त्यावरच माझं स्पष्टीकरण त्यांच्यासमोर देईन. आणि तेही जे काही निर्णय घेतील, तो मला मान्य असेल.

तुमच्या भूमिकेनंतर पक्षांतल्या वरिष्ठ नेत्यांनी तुमच्याशी संपर्क साधला का?


नाना पटोले :  मला आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा या प्रकरणावरुन फोन आला. त्यांना याबाबत मी माझं सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये आपण यावर सविस्तर चर्चा करु, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना याबाबत अवगत करु आणि जे काही भूमिका असेल ते स्पष्ट करु.

सध्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि गोपाल अग्रवाल भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, याबाबत तुमचं मत काय?


नाना पटोले :  प्रफुल्ल पटेल आणि गोपाल अग्रवाल यांच्या मनात काय आहे, हे मी सांगू शकत नाही. पण सध्या देशातील अनेक पक्षातील नेते भारतीय जनता पक्षात येण्याचा तयारीत आहेत. त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि गोपाल अग्रवाल यांच्या मनात नक्की काय आहे, हे मी सध्या सांगू शकत नाही.

2019 साठी भंडारा आणि गोंदियामध्ये भाजपनं राष्ट्रवादीशी सूत जुळवून घ्यावं अशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून असल्याचं बोललं जात आहे, यात कितपत तथ्य आहे?


नाना पटोले :  व्यक्तीश: मला तरी तशा काही सूचना मिळालेल्या नाहीत. पण तुम्ही म्हणता तसा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये ताळमेळ काही दिसत नाही. त्यामुळे असा काही निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतला जात असेल, तर तर त्याचा आम्ही आदरच करु.

प्रफुल्ल पटेल आणि गोपाल अग्रवाल भाजपमध्ये आले तर पक्षात काय बदल होतील?


नाना पटोले :  जर ते पक्षात येत असतील, आणि वरिष्ठ त्यांना सन्मान देत असतील, तर त्यांचं आम्हीही स्वागत करु.

भाजपवर नाराज आमदार खासदारांची प्रतिक्रिया काय?


नाना पटोले : मला अनेक आमदार, मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे फोन आले. आणि त्यांनीही आपल्या भावना माझ्यासमोर मांडल्या. खासदार तर आम्ही दिल्लीत भेटल्यावर बोलतच असतो. त्यामुळे यावरुन जेव्हा अमित शहा आणि पंतप्रधान मोदींकडून बोलावणं येईल. तेव्हा त्यांच्यासमोर मी माझी सविस्तर भूमिका मांडेन.

नाना पटोलेंची सविस्तर मुलाखत पाहा