भंडारा : नोटाबंदी आणि जीएसटीवरुन भाजप खासदार नाना पटोले यांनी त्यांच्याच पक्षाला पुन्हा एकदा फैलावर घेतलं. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापाऱ्याचं कंबरडं मोडलं आहे. तर शेतकरीही अडचणीत आहेत. त्यामुळे व्यापारी, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी वेगळी चळवळ उभी करण्याचं नाना पटोले यांनी जाहीर केलं आहे.


भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील दसरा मेळाव्यात काल रात्री नाना पटोले यांनी सरकारला पुन्हा एकदा फैलावर घेतलं. शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता व्यापारीही आवाज उठवण्याची विनंती करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यातील लहान व्यापारी, शेतकरी, बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन एक वेगळी विरोधी चळवळ उभारु. केवळ भंडारा, गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विचार नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करू, असं नाना पटोले यांनी जाहीरपणे सांगितलं.

यापूर्वीही नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारवर हल्लाबोल केला होता. राज्य सरकारनं सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावलं उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले. पटोले यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता.

कुणाच्या खुर्चीवर असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडता येत नसतील, तर ती खुर्चीच परत देऊ असं म्हणत पटोले यांनी पुढचे संकेत दिले.

मोदी सरकार हे अंबानी आणि अदानी यांची घरं भरण्याचं काम करत असल्याचा सनसनाटी आरोप पटोले यांनी केला. नाना पटोले हे गोंदिया-भंडारामधून भाजपचे खासदार आहेत.

संबंधित बातम्या :

तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल, नाना पटोलेंचे राजीनाम्याचे संकेत


फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले


पेट्रोल दरवाढ : भाजप खासदार नाना पटोले दिल्लीत जाब विचारणार


चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चीड आणणारं: नाना पटोले


चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणं म्हणजे पक्षाला विरोध नव्हे : नाना पटोले