मुंबई: उत्तर प्रदेशातील शेतकरी कर्जमाफीनंतर महाराष्ट्रातही रान पेटलं आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी शेतकरी कर्ज माफीची मागणी लावून धरली असताना, सत्ताधारी भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या वक्तव्याने, आणखी आक्रमक झाले.


"माझं स्पष्ट म्हणणं आहे की कर्जमाफी अजिबात होऊ नये. त्यांच्या अकाऊंटला पैसे द्या" असं प्रशांत बंब म्हणाले.

मात्र बंब यांनी हे वक्तव्य करताच, शिवसेनेसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रशांत बंब यांना सभागृहातच धारेवर धरलं.



 मुख्यमंत्र्यांचं निवेदन

“यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभं आहे. उत्तर प्रदेशने कर्जमाफी केल्यानंतर, मी अर्थसचिवांना यूपीकडून माहिती मागवण्याचे आदेश दिले आहेत. कर्जमाफीचं मॉडेल काय, ते पैसे कुठून आणि कसा उभा करणार याची माहिती घेण्यास सांगितलं आहे” असं मुख्यमंत्री म्हणाले.

याशिवाय कर्जमाफी हा आमचा म्हणजेच राज्य सरकारचा विषय आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाने सांगण्याची गरज नाही. राज्य सरकार सक्षम आहे, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं.

धनंजय मुंडे आक्रमक

उत्तर प्रदेशात भाजपप्रणित योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे. महाराष्ट्रातही भाजपचंच सरकार आहे. मग एकाच पक्षाची दोन राज्यात वेगवेगळी विचारधारा कशी असू शकते? महाराष्ट्रातल्या भाजपला काय झालंय? असे सवाल, धनंजय मुंडे यांनी उपस्थित केले.

कर्जमाफीतर सोडाच पण गेल्या अडीच वर्षात या सरकारने शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. आज नऊ हजार आत्महत्या झाल्या, उद्या पंचवीस हजार आत्महत्या व्हायची सरकार वाट पाहतंय का? या अधिवेशनाच्या काळात 100 शेतकाऱ्यांनी आत्महत्या केल्या याची लाज वाटली पाहिजे, असा हल्लाबोल मुंडेंनी केला.

 संबंधित बातम्या
महाराष्ट्रातील भाजपला काय झालंय?: धनंजय मुंडे

आम्ही सक्षम, हायकोर्टाने कर्जमाफीबद्दल सांगू नये : मुख्यमंत्री