पुणे : शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या मोदी बागेत माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या एन्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ते राष्ट्रवादीत तर येत नाही ना? अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपत गेलेले आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्याआधी भाजपकडूनही अशाच प्रकारचा दावा करण्यात आला आहे.


भाजपशी फारकत घेऊन शिवसेनेने आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले आहे. राज्यात सत्तास्थापनेसंदर्भात या पक्षांमध्ये सध्या बैठकींवर बैठकी सुरु आहेत. अशा परिस्थितीत आमदार जयकुमार गोरे मोदी बागेत दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार आमच्याशी संपर्क करत असून आमच्यासोबत येण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता, मला याबद्दल कल्पना नसल्याचे ते म्हणाले. तर आमदार जयकुमार गोरे यांनी खासगी कामनिमित्त आलो असल्याचे सांगितले. लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेते, विद्यमान आमदार भाजपमध्ये गेले होते. याशिवाय अनेकांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. तर, याआधी भाजप नेते

भाजपकडूनही दावा -
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. याला उत्तर देताना माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी राष्ट्रवादीचेच 9 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच आमचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.