सांगली : कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करून काही होणार नाही. खुर्ची सोडून रस्त्यावर उतरावे, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच लोकांच्या मनात भीती आणि दहशत निर्माण करायचे सरकारने बंद करावे. सरकारचे पाप जनतेच्या माथी मारून जनतेला जबाबदार ठरवायचे बंद करावे, असा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील वाढत्या कोरोना स्थितीबाबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. यावरून भाजपा प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हवर कशासाठी आले, त्यांनी त्यामध्ये वारंवार बेरोजगारी आणि लॉकडाऊन यांचा उल्लेख केला. ही बाब दुर्दैवी असून यामुळे जनतेच्या मनामध्ये काय संदेश जाणार आहे? लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आणि दहशत निर्माण करणे बंद करावे. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारने लॉकडाऊनचा खेळ लावला आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. 


Maharashtra New Corona Guidelines: ..तर राज्यात लॉकडाऊन लागणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


एक वर्षात सरकारने काय केले? कोरोनाचा प्रसार रोखता आला नाही हे आता जनतेला कळले आहे. त्यामुळे सरकारने आता ते कबूल करावे. लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊनशिवाय कोरोना नियंत्रणात आणता येतो, पण हे सरकार प्रत्येक वेळी जनतेला गृहीत धरून मनमानी निर्णय घेऊन जनतेला जबाबदार ठरवत आपले पाप जनतेच्या माथी मारत आहे. सरकारने असं करणे बंद करावे आणि मुख्यमंत्री यांनी फेसबुक लाईव्हमध्ये कपडे बदलून येण्यापेक्षा खुर्ची सोडून रस्त्यावर यायला पाहिजे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.