अहमदनगर : ज्याची तुम्ही सभागृहात लादेन आहे का? असा प्रश्न विचारत पाठराखण केली तो सचिन वाझे आज आरोपी सिद्ध झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृह आणी महाराष्ट्राची दिशाभूल केली. आता मुख्यमंत्री याचे प्रायश्चित्त घेणार का? असा सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.


राधाकृष्ण विखे पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. आघाडीचा समान विकास कार्यक्रम नाही तर समान लुटीचा कार्यक्रम सुरू आहे. एवढी गंभीर घटना घडली आहे, त्याची वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची गरज असून न्यायाधीशांच्या समीतीकडून प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घेतला जावा आणि सेवानियमाचा भंग करणारे परमबीर सिंह यांना निलंबित का केलं नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे गंभीर आरोप झाले आहेत. आम्हाला शहाणपण शिकवणाऱ्या अतीशहाण्या सल्लागारांचा तरी मुख्यमंत्र्यांनी आता सल्ला ऐकावा, अशी टीका संजय राऊत यांचे नाव न घेता विखे पाटील यांनी केली.


सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय : मुख्यमंत्री


मी जबाबदार म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हे विसरू नये तुमचे मंत्रीही तुमची जबाबदारी आहे. मंत्र्यावर कारवाई केली नाही तर उद्या संशयाचे भूत तुमच्यापर्यंत येईल, असं विखे पाटील यांनी म्हटलं. हे प्रकरण केवळ अनिल देशमुखांपर्यंत मर्यादित नाही तर सरकारमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक खात्यात भ्रष्टाचाराची मालिकाच सुरू असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.


काय बोलले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?


अँटिलियाबाहेर जिलेटीन कांड्या सापडल्याचा तपास सुरु आहे. आधी फाशी द्या मग तपास करा याला अर्थ नाही. ही सरकारची पद्धत नाही. अजून एक नवीन पद्धत आहे, टार्गेट करायचं आणि चारित्र्यहनन करायचं, हे आम्ही नाही करणार. एवढं झाल्यावरही मनसुख हिरण यांच्या मृत्यूची दखल आम्ही घेतली. सचिन वाझे म्हणजे, ओसामा बिन लादेन असं चित्र निर्माण केलं जातं आहे. पण जो सापडेल त्याला दया माया दाखवणार नाही , असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.