Kirit Somaiya : कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावर 19 बंगले असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेला. ज्या गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंगले आहेत, त्याच गावात आज भाजप नेते किरीट सोमय्या भेट देणार आहेत. 


किरीट सोमय्यांच्या दौऱ्यात शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. रायगडच्या कोर्लई गावात उद्धव ठाकरेंनी 19 बंगले खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. आता पडताळणीसाठी सोमय्या आज कोर्लई गावात जाणार आहेत. कोर्लई गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 


अलिबागच्या आमदारांचा सोमय्यांना इशारा 


मुख्यमंत्र्यांची नाहक बदनामी करत असाल तर उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी दिला आहे. सोमय्यांनी खोटे आरोप करु नये अशी विनंतीही दळवी यांनी केली आहे. आदेश असेल तर शिवसेनेचा दणका दाखवू, असा इशारा आमदार भरत गोगावले यांनी दिला आहे. 


सोमय्या-राऊत वाद शिगेला 


भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद दिवसेंदिवस पेटत चाललाय. संजय राऊत गेल्या ३ दिवसांपासून आरोपांच्या फैरी झडतायेत, त्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी किरीट सोमय्या पुढे येतायेत. त्यामुळं प्रश्न असा आहे, हे दोघं नेते एकमेकांवर जे आरोपप्रत्यारोप करतायेत ते सर्व आधी सिद्ध करुन दाखवणार? की फक्त एकमेकांना लाखोल्या वाहण्याचा कार्यक्रम सुरु राहणार? 


सोमय्यांचा नेमका आरोप काय? 


अलिबागमधील 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला किरीट सोमय्या यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचं सांगितलं. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता.


राऊतांनी सोमय्यांचे दावे फेटाळले


सोमय्या म्हणाले होते, संजय राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी जर टॅक्स भरला नाही असे लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असेही सोमय्या यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी माझ्याबाबत काही आरोप केले आहेत, माझी खुशाल चौकशी करा असे सोमय्या यावेळी म्हणाले. 19 बंगल्यावर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो असं ते म्हणाले, पण नेमकं कोणाला जोडे मारायचे आहेत असेही सोमय्या म्हणाले. 2013 ते 2021 या काळात सगळा कर रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरं नाही तर घरपट्टी का भरतात? किरीट सोमय्यांना कशाला, रश्मी ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना तिथे घेऊन जा, मनिषा वायकर यांना तिथे घेऊन जा असे किरीट सोमय्या म्हणाले. यावेळी किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील दिला आहे. रश्मी ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला कर भरला, त्यानंतर ती घरे चोरीला गेली का? असा सवाल सोमय्या यांनी केला. त्यासंबंधी मी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा प्रश्न देखील सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला. त्यावर आज कोर्लई गावचे सरपंच मिसाळ यांनी ही माहिती देत सोमय्यांचा दावा फेटाळून लावला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha