Chandrakant Patil : राज ठाकरे यांचे अस्तित्व धोक्यात येईल असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरे यांची चिंता नसावी असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. भाजपचा अजेंडा जरी बाळासाहेब थोरात यांनी राबवला तरी आम्ही स्वागत करु असे देखील पाटील म्हणाले. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली नसती तरी सभा झाली असती. सध्या मनसेसोबत युती करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे पाटील यांनी सांगितले.


कोल्हापूर-पुणे महामार्गावर अनेक कॅमेरे लावले आहेत. थोडा वेळ वाढला की लगेच दंड केला जातो. आताचा दंड देखील भरला आहे. रस्ते चांगले झाले, मग नागरिकांनी गाड्या चांगल्या घेतल्या. आता त्याला स्पीड लिमिट लावलं जातं आहे. अशा दंडामुळे घरं दारं विकायची वेळ येईल, असे पाटील म्हणाले. राजद्रोह, देशद्रोह गुन्हा कशाही वेळी लावला जातो. मातोश्रीच्या समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा संकल्प हा राजद्रोह कसा होऊ शकतो? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. 


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्याविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला 3 मे रोजीचा अल्टिमेटम दिला  आहे. तेव्हापासूनच राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरु झालं आहे. 3 मेच्या अल्टिमेटमपूर्वी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. परंतु, त्यापुर्वी राज ठाकरे पुण्याचा दौरा करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दिवस पुण्यात असणार आहेत. औरंगाबादच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे पुण्यातून 30 एप्रिलला रवाना होणार आहेत. राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेला विविध संगटनांनी विरोध केला होता. पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेला परावनगी देऊ नये अशी मागमी केली होती. मात्र, अखेर राज यांच्या सभेला परवानगी मिळाली आहे. या सभेसाठी पोलिसांनी 15 अटी घातल्या आहेत. त्यामुळं 1 मे रोजी होणारी सभा राज ठाकरेंना अटींचं पालन करुनच घ्यावी लागणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: