Chandrakant Patil : सरकारमधील मंत्री जेलमध्ये जात आहेत. परंतु, सध्या सुरू असलेला प्रकार हा चोराला सोडून सावाला शिक्षा देण्यासारखा आहे. बुडत्याचा पाय खोलात जातोय, सरकारची ही विनाशकाले विपरीत बुद्धी असून राज्य सरकार गोंधळून आणि घाबरून गेले आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे. 


पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, "विरोधीपक्षनेत्याला अशी विचारणा करता येणार नाही, सरकारवर अंकुश ठेवणं हे त्यांचं काम आहे. विरोधी पक्षातील कोणीतरी जायला पाहिजे म्हणून फक्त ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सरकार गोंधळून आणि घाबरून गेले आहे. राज्य सरकारमधील मंत्री जेलमध्ये जात आहेत. 27 महिन्यांत सर्व विषयात सरकार तोंडावर पडत आहे. देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली असली तरी देंवेद्र फडणवीस एकटे नाहीत,  महाराष्ट्रातील जनता त्यांच्या सोबत आहे." 


"सरकारवर ज्यांचा अंकुश आहे, त्यांनी इंजेक्शन दिले असेल. त्यामुळेच ही नोटीस आली असावी. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांना नऊ तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांना किती तास बसवतात? ते पाहू. जे घडतंय ते चांगलच आहे. परंतु, आता पापाचा घडा भरला आहे. त्यामुळे खूप लोकांचं बिंग बाहेर पडणार आहे. ही विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. राज्य सरकार महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याला मागे घेऊन जात आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 


महत्वाच्या बातम्या