Chandrakant Patil : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. या मुद्यावरुन भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी फडणवीस यांनाच नोटीस बजावली आहे. याचा आपण तीव्र शब्दात निषेध नोंदवत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीची वाटचाल विनाशाकडे होत असून, संपूर्ण भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी उभा असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
 
नेमकं कय म्हणाले चंद्रकांत पाटील


आघाडी सरकारच्या मंत्र्यांची भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर पडत आहेत. एका मागोमाग एक मंत्री तुरुंगात जात आहेत. त्यांचा पापांचा घड भरत आला आहे. यामुळे आघाडीचे नेते घाबरुन गेले आहेत. परिणामी त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे पाटील म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेत्याला माहिती मिळवण्याचा विशेष अधिकार असतो. त्यांना माहिती कोठून मिळाली, असे विचारता येत नाही. तरीही या सरकारने बेकायदेशीर रितीने त्यांना नोटीस पाठवली आहे. हे सरकार वारंवार कायदा धाब्यावर बसवून काम करत आहे. परिणामी त्यांना अनेकदा न्यायालयाकडून थपडा खाव्या लागल्या आहेत, असा टोलाही पाटील यांनी लगावला. अनिल देशमुख, सचिन वाझे, भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन अशा अनेक प्रकरणात राज्य सरकारला न्यायालयाचे फटके बसले आहेत.


बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर त्याची तपशीलवार माहिती असलेला पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीस यांनी त्याच दिवशी केंद्रीय गृह सचिवांकडे तपासणीसाठी सादर केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. अशा रितीने फडणवीस यांना लक्ष्य करुन हा तपास रोखता येणार नाही. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघ होण्याची शक्यता असल्याचे पटील म्हणाले. दरम्यान, आज  फडणवीसांना आलेल्या नोटिशीविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. आज राज्यभर मुंबई पोलिसांच्या नोटिशीची होळी भाजपतर्फे करण्यात येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: