जालना : भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची जाहीर कार्यक्रमात बोलताना जिभ घसरली आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी हिरोईन आणू, असं वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. एवढंच बोलून लोणीकर थांबले नाहीत तर त्यानंतर त्यांनी स्टेजवर बसलेल्या तहसीलदार या हिरोईनसारख्याच दिसतात, असं म्हटलं. लोणीकरांच्या भाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूर गावातील एका जाहीर कार्यक्रमात बबनराव लोणीकर बोलत होते. बबनराव लोणीकरांच्या या वक्तव्याने त्यांच्यासाठी शेतकरी प्रश्न किती गंभीर आहेत हे दिसून येत आहे. ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर बबनराव लोणीकरांशी संपर्क साधला असता, त्यांनी ऑडिओ क्लिप माझी असल्याचं मान्य केलं आहे. मात्र मी बोललो त्यात काहीच चुकीचं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.


विरोधकांची टीका


भाजपची संस्कृती रसातळाला गेली आहे. बबनराव लोणीकरांचं वक्तव्य आक्षेपार्ह आहे, मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते, असं राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी हिरोईन आणा आणि मोर्चा मोठा करा, असं लोणीकरांनी म्हटलं तेही चुकीचंच आहे. शेतकऱ्यांसाठीच्या मोर्चाचं उद्दीष्ट काय आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर मोर्चाला शेतकरी आणा. मात्र भाजपच्या मोर्चात शेतकरी सहभागी होणार नाहीत, म्हणून त्यांच्याकडून असे प्रयत्न केले जातात. एका महिलेबाबत असं वक्तव्य विनयभंगाचा गुन्हा आहे. महिला अधिकाऱ्यांचा सन्मान करणं गरजेचं असून असं वक्तव्य लज्जास्पद आहे, असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं.


एखाद्या महिलेबद्दल असं वक्तव्य करणं निषेधार्थ आहे. बबनराव लोणीकरांनी याबाबत माफी मागावी. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून लोणीकरांवर काय कारवाई करता येईल, याची माहिती आम्ही घेऊ, असं तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश बगळे यांनी म्हटलं आहे.


बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण


बबनराव लोणीकर यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हिरोईन शब्दाचा अर्थ कर्तबगार महिला असा होतो. तहसीलदारांना हिरोईन हा शब्द आदराने वापरला. विरोधकांनी हिरोईन शब्दाचं भांडवलं करु नये, असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे.


काय म्हणाले बबनराव लोणीकर?


सरकारकडून 25 हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचा का तुम्ही ठरवा. सगळ्या सरपंचांनी आपाआपल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद लावली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा येथे होऊ शकतो. आणि अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला, तर 25 हजार लोक आणेल, 50 हजार लोक आणेल, तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस यांना आणू, तुम्ही सांगा चंद्रकांतदादा पाटलांना आणू. तुम्ही सांगा सुधीर भाऊंना आणू. कुणाला आणायचं तुम्हाला वाटलं तर मग एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन आणू आणि नाही जर कोणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच, त्या निवेदन घ्यायला येतील, असं बबनराव लोणीकरांनी म्हटलं.