'भाजप निजाम, मग शिवसेना रझाकार आहे का?'
एबीपी माझा वेब टीम | 12 Jun 2016 09:27 AM (IST)

नागपूरः युतीत धुसफूसत असलेली पोस्टरवॉरची धग आज पुन्हा एकदा भडकली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा असणारं वृत्तपत्र तरुण भारत हे याला कारण ठरलं आहे. तरुण भारतच्या लेखातून शिवसेनेला खोचक सवाल करण्यात आला आहे. भाजपचं सरकार निजाम असेल तर सेना सत्तेत कशी?, ज्यांनी दलित वस्त्यांवर हल्ले केले?, कसलेही आंदोलनं पुकारुन हफ्ते स्विकारले त्यांना रझाकार म्हणायचं का?, असा जहरी प्रश्न तरुण भारतमधल्या एका लेखातून सेनेला विचारला आहे. 'बावचळलेल्या शिवसेनेचा तोल सुटलाय' अशा मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. स्तंभलेखक दिलीप धारुरकर यांच्या लेखात संजय राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारची तुलना निजाम सरकारशी केली होती. तेव्हापासून या वादाला तोंड फुटलं आहे. राऊतांच्या टिकेनंतर सोशल मीडियातून भाजपद्वारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांत प्रहार केले गेले आहेत.