भाजपचे मॅनेजमेंट परफेक्ट असल्याने ईव्हीएममधला दोष सिद्ध करता येत नाही; अशोक चव्हाणांचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 05 Aug 2019 06:37 PM (IST)
ईव्हीएमबाबत भाजपचे मॅनेजमेंट परफेक्ट असल्याने ईव्हीएममधील दोष सिद्ध करता येत नाहीयेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.
जालना : ईव्हीएमबाबत भाजपचे मॅनेजमेंट परफेक्ट असल्याने त्यामधील दोष सिद्ध करता येत नाहीयेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेसतर्फे जालना येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक चव्हाण बोलत होते. अशोक चव्हाण म्हणाले की, ईव्हीएममध्ये मोठं गौडबंगाल आहे. सर्वच राजकीय पक्ष ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान करण्याचा आग्रह धरत आहेत. असे असूनही केवळ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेलाच ईव्हीएमवर मतदान हवं आहे. त्यांनाच मतपत्रिकेद्वारे मतदान का मान्य नाही? असा सवालही चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला. अशोक चव्हाण म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची खरंच खूप लोकप्रियता असेल तर त्यांनी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात आणि निवडणुकीत जिंकून दाखवावं, असे आव्हानही चव्हाण यांनी भाजपला दिले आहे. काँग्रेसमधला अंतर्गत संवाद पूर्णपणे थांबलाय का?, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी बातचित | एबीपी माझा