Maharashtra Politics: राज्यातील राजकारणात रोज काही ना काही नवी घडामोड घडत आहे. आता अशीच घडामोड समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) काही दिवसांपूर्वी खासदार आणि त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्यासोबत दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र अमित शाहांनी ही भेट नाकारल्याची चर्चा होती. एकनाथ खडसेंनी त्यानंतर शाहांसोबत फोनवर चर्चा झाल्याचं म्हटलं होतं. मात्र या भेटीबाबत आता भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. खडसेंना तीन तास ऑफिसबाहेर बसवून अमित शाह यांनी खडसेंना भेट नाकारली अशी माहिती रक्षा खडसेंनी दिल्याचा दावा महाजन यांनी केला आहे.


गिरीश महाजन म्हणाले की, अमित शाहांच्या कार्यालयाबाहे एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे बसलेले होते. तिथून मलाही फोन आला. मी मग माहिती घेतली. रक्षाताईंना देखील मी विचारलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, आम्ही तीन तास तिथं बसलो. पण आम्हाला वेळ दिली नाही. भेटायला नकार दिला हे मला त्यांनीच सांगितलं. ते भेटायला गेले होते मात्र भेट काही झाली नाही, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंकडून सगळं मिटवण्याची भाषा केल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपत परतणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 


खडसेंनी दिलं होतं स्पष्टीकरण


एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं की, गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत आपली भेट झाली नाही. काही वैयक्तिक कारणांसाठी दूरध्वनींवरून त्यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे खडसे यांनी सांगितलं होतं. या चर्चेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होतं. शरद पवार यांनी आपल्यासोबत शाह यांची भेट घेण्यास सांगितले असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं.  राष्ट्रवादी काँगेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा कोणताही प्रश्नच नसल्याचे खडसे यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं. भाजपमध्ये 40 वर्ष काम केले. पक्षवाढीसाठी मोठे कष्ट केले, महत्त्वाची पदेदेखील भूषवली. मात्र, मधल्या कालखंडात माझ्यावर अन्याय होत असल्याचे मला वाटत होते. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या कोंडीनंतर त्यानंतर भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं. त्यानंतरच्या काळात राजकारणापासून तीन वर्षे दूर होतो. राजकारणातून जवळपास बाहेर गेल्यानंतर शरद पवार यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी विधान परिषदेत निवडून आणले. ज्यांनी मला राजकीय विजनवासातून बाहेर काढले , त्या पक्षाला कसे सोडू असा सवाल त्यांनी केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या


'पाच दहा वर्षानंतर कशाला? आताच निवृत्ती घ्या'; एकनाथ खडसेंचा चंद्रकांत पाटलांना टोला 


Eknath Khadse Exclusive : भाजपात जाण्याच्या चर्चा निरर्थक, राष्ट्रवादीने माझं पुनरुज्जीवन केलंय