भिवंडी : नगसेवकांच्या घोडेबाजारामुळे नेहमीच बदनाम असलेल्या भिवंडी महानगरपालिका महापौर निवडणुकीत बहुमतात असलेल्या काँग्रेस सोबतच शिवसेना आणि कोणार्क विकास आघाडीकडूनही उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने महापौर पदाची निवडणूक पुन्हा एकदा चुरशीची होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.


भिवंडी महानगरपालिका महापौर व उप महापौर पदाची निवडणूक 5 डिसेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारपर्यंतची मुदत दिली होती. रिषिका प्रदीप राका ( काँग्रेस ) वैशाली मनोज म्हात्रे ( काँग्रेस ) , वंदना मनोज काटेकर ( शिवसेना ) , प्रतिभा विलास पाटील ( कोणार्क विकास आघाडी ) यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे इम्रान वली मोहम्मद खान, तलाह मोमीन , मुख्तार मोहम्मद अली खान, राबिया मकबूल हसन खान, शिवसेनेचे संजय लक्ष्मण म्हात्रे, बाळाराम चौधरी, मदन बुवा नाईक अशा सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणावर घोडेबाजारा सुरु होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे नक्की विजयश्रीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे येत्या दोन दिवसात कळेल.

90 सदस्य असलेल्या भिवंडी महानगरपालिका सभागृहात कॉंग्रेसचे 47, भाजपचे 19 , शिवसेनेचे 12, कोणार्क विकास आघाडीचे 4, सपा 2, आरपीआय एकतावादी 4, अपक्ष 2 असे बलाबल आहे. काँग्रेस पूर्ण बहुमतात असतानाही शिवसेने सोबत आघाडी केली. त्यामुळे शिवसेनेला उपमहापौर पद मिळाले. येत्या 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकीत काँग्रेसकडून रिषिका प्रदीप राका व वैशाली मनोज म्हात्रे या प्रबळ दावेदार असून पक्षश्रेष्ठी नक्की कोणाला संधी देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या तरी रिषिका प्रदीप राका यांच्या बाजूने सत्ताकल आहे. कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा विलास पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्याने चुरस राहणार आहे. यापूर्वी 2012 मध्ये काँग्रेसचे 26 सदस्य असूनही अवघे चार सदस्य असलेल्या कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांनी काँग्रेसच्या दोन सदस्यांना अनुपस्थित ठेवून विजयश्री खेचून आणली होती. त्याच पार्श्वभूमीवर विलास पाटील पुन्हा काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवून देत विजय मिळविणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

आज महापौरपदासाठी कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा पाटील व उपमहापौर पदासाठी इम्रान खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना विलास पाटील व संतोष शेट्टी हे उपस्थित होते हे विशेष. काँग्रेसचा उमेदवारी अर्ज दाखल करताना 47 पैकी काही मोजकेच नगरसेवक उपस्थित असल्याने काही नगरसेवक विलास पाटील गोटात तळ ठोकणार असल्याची चर्चा सुरु आहे.