Prakash Ambedkar: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नेते वसंत मोरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटाच पक्षप्रवेश केला, त्यानंतर आता आणखी एका नेत्याने प्रकाश आंबेडकर यांची साथ सोडली आहे. धाराशिव लोकसभेचे उमेदवार राहिलेले भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचितला सोडचिठ्ठी दिली आहे. आता ते कोणत्या पक्षात जाणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 


लोकसभेत मिळालेल्या पराभवानंतर आधी वसंत मोरे (Vasant More) यांनी साथ सोडली आता भाऊसाहेब आंधळकर यांनी देखील सोडचिठ्ठी दिल्याने वंचितला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच वंचित बहुजन आघाडीतील नेत्यांनी साथ सोडली आहे त्यामुळे पुन्हा या ठिकाणी आंबेडकरांना लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांची मराठा आरक्षणावरील मराठा समाजाबाबतची भूमिका पटली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापताना आहे. याचा मोठा फटका आता वंचित बहुजन आघाडीला बसल्याचं दिसत (Maharashtra Politics) आहे. प्रकाश आंबेडकरांनी गेल्या काही दिवसांमध्ये मनोज जरांगेवर हल्लाबोल करत त्यांना डिवचलं आहे. त्यांची ही भूमिका पक्षातील नेत्यांनाच पटत नसल्याचं चित्र दिसून येत आहे.


भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी शिवसेना शिंदे गटातून वंचितमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी नुसतीच झालेली लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली (Vanchit Bahujan Aghadi) होती. आता भाऊसाहेब आंधळकर यांनी पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. 


प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी बचाव मोहिम काढली आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखीनच बिकट झाला आहे, त्यामुळे मी व्यथित झालो आहे. याच कारणामुळे वंचित बहुजन आघाडीची साथ सोडत असल्याचं भाऊसाहेब आंधळकर यांनी स्पष्ट केलं आहे.


कोण आहेत भाऊसाहेब आंधळकर?


भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) हे आता वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार असणार आहेत. दरम्यान, भाऊसाहेब आंधळकर हे नेमके कोण आहेत. त्यांची राजकीय कारकिर्द काय आहे? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. भाऊसाहेब आंधळकर हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नोकरी सोडून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. 


2011 साली त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. तर राज्यातील राजकीय घडामोडीनंतर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख होती. पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. माजी विधानसभा सभापती वसंत डावखरे यांच्यासोबतचा त्यांचा वाद गाजला होता. आंधळकर यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला होता. तसेच आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे नाव समोर आले होते. दरम्यान, आंधळकर यांचे नाव सातत्यानं चर्चेत असते. एक आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे.