'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात भारत गणेशपुरे त्यांच्यासोबतच्या कलाकाराला उद्देशून बोलताना एक डायलॉग म्हणाले होते. "ट्रेनमध्ये जसे आलेपाकवाले घुसतात, तसा तू माझ्या घरामध्ये घुसला आहेस." परंतु भारत गणेशपुरे अलिबागबद्दल आक्षेपार्ह बोलले असल्याचा दावा अलिबागमधील रहिवाशांनी केला. त्यामुळे भारत गणेशपुरे यांनी अलिबागकरांची माफी मागावी, अशी मागणी अलिबागकरांनी मांडली.
त्यानंतर अलिबागमधील रहिवाशांनी भारत गणेशपुरे यांना फोन केला. रहिवाशांनी गणेशपुरे यांना याप्रकरणी जाब विचारला असता, गणेशपुरे म्हणाले की, "मी अलिबाग नव्हे तर आलेपाकवाले ट्रेनमध्ये घुसखोरी करतात, असे म्हणालो होतो. हवं तर तुम्ही माझा संवाद पुन्हा एकदा ऐका."
अखेर गणेशपुरें यांचा संवाद लोकांनी पुन्हा एकदा ऐकला. अलिबाग नव्हे तर आलेपाकचा उल्लेख असल्याची अलिबागकरांची खात्री पटली आणि संवादवारुन रंगलेलं नाट्य आता शांत झालं आहे.