बीड/अहमदनगर: भगवानगड वादाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. कारण भगवानगडावरील विकासकामांच्या तक्रारीची चौकशी सध्या सुरु झाली आहे. तसेच संबंधित ग्रामसेवक, सरपंच, भगवानगड ट्रस्टवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश पंकजा मुंडेंच्या ग्रामविकास खात्यानं दिले आहेत.


चव्हाण ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत मंजूर 10 लाखांचं सभागृह प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याची तक्रार केली गेली आहे. याशिवाय अनेक गैरव्यवहारांचे आरोप पाथर्डीचे माजी सभापती संपत कीर्तने यांनी केले आहेत.

दरम्यान, हे आरोप भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी फेटाळून लावलेत. माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा लागणार हे गृहितच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पंकजा मुंडेंच्या भगवानगडावरील दसरा मेळाव्याला गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी विरोध केला होता. त्यामुळे पंकजा मुंडेंना हा मेळावा गडाच्या पायथ्याशी घ्यावा लागला होता. यावेळी पंकजा मुंडेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करुन आव्हान दिलं होतं.

त्यामुळे भगवान गडावरुन सुरु झालेला वाद भविष्यात आणखीनच वाढेल अशी चिन्हे दिसत होती. त्याचाच परिपाक म्हणून आता भगवानगडाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याचे बोलले जात आहे.