भंडारा : आईच्या मांडीवर खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्या मुलाला मद्यपी बापानं ओढत नेत त्याला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली या गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपी राजेंद्र गायधने याला अटक केली आहे.


विरली येथील राजेंद्र गायधने याला मद्यप्राशनाची सवय असल्याने नेहमी प्रमाणे तो मद्य प्राशन करून घरी पोहोचला होता. यावेळी त्याचा चिमुकला तीन वर्षीय मुलगा अथर्व हा आईच्या मांडीवर बसलेला होता. त्यावेळी मद्यपी बापानं त्याला आईकडून जबरदस्तीनं हिसकावून अंगणातील जमिनीवर आपटलं, यात चिमुकला गंभीर जखमी झाला. यानंतर आईनं गंभीर जखमी बालकाला मद्यपी बापाच्या तावडीतून सोडवलं आणि उपचारासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्यानं पुढील उपचारासाठी बाळाला भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. लाखांदूर पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.


कोल्हापुरात तीन अल्पवयीन मुलींचं अपहरण अन् दारु पाजून अत्याचार


तीन महाविद्यालयीन अल्पवयीन मुलींचं अपहरण करून त्यांनी मद्य पाजून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात दोन नराधमांना पाच वर्ष सक्तमजुरी आणि साडेआठ हजार रुपये दंडाची शिक्ष सुनावण्यात आली आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये आरोपींनी कोल्हापुरातून मुलींचं अपहरण केल्यानंतर इस्लामपूरमध्ये (ता. वाळवा, जि. सांगली) त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. हर्षल आनंदा देसाई (वय 24, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) आणि प्रमोद हणमंत शिंदे (वय 24, रा. गांधीनगर, ता. करवीर) अशी आरोपींची नावं आहेत. या गुन्ह्यातील तिसरा संशयित आरोपी अल्पवयीन आहे. त्याच्यावर बालहक्क न्यायालयात खटला सुरू आहे.


मद्य प्राशन करायला भाग पाडून मुलींवर लैंगिक अत्याचार


इस्लामपूर येथील शिवनगर येथील एका कॉलनीतील इमारतीच्या फ्लॅटमध्ये 2 आणि 3 नोव्हेंबर 2018 हा प्रकार घडला होता. सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुली आणि तिन्ही आरोपी कोल्हापुरात एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. आरोपींनी पीडित मुलींना महावीर गार्डनमध्ये बोलवून घेतलं. त्यानंतर जबरदस्तीने त्यांना इस्लामपूरमधील भाड्याच्या खोलीत घेऊन गेले. तिथे मुलींना मद्य प्राशन करायला भाग पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी मुलींच्या अंगावरील दागिने काढून घेऊन ते कोल्हापुरातील एका सराफाला विकले. त्यातून आलेल्या पैशातून मद्य प्राशन करून आणि गांजा ओढून पुन्हा मुलींचा लैंगिक छळ केला. 


दरम्यान, तिन्ही मुली दोन दिवस घरी परत न आल्याने त्यांच्या पालकांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तत्कालिन पोलिस अधिकारी स्मिता पाटील यांना मुलींचे मोबाईल लोकेशन इस्लामपूर असल्याचे आढळले. पोलिसांचे पथक तिथे गेल्यावर दोन्ही आरोपी आणि मुली फ्लॅटमध्ये आढळल्या होत्या. यानंतर सरकारी वकील कुलकर्णी यांनी न्यायालयात 19 साक्षीदार तपासले. साक्षी, पुरावे आणि ॲड. कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश तिडके यांनी आरोपींना विनयभंगप्रकरणी दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा देखील सुनावली.


हेही वाचा:


Aurangabad : मोठी बातमी! औरंगाबाद पोलिसांकडून संशयित वाहनावर गोळीबार, पोलिस पथकाला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न