Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. मधल्या काळात तर ते आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चांगलेच अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं होतं. शुक्रवारीदेखील त्यांनी अशाचप्रकारचं अडचणीत आणणारं वक्तव्य करुन स्वतःची सोबतच भाजपची देखील चांगलीच गोची केल्याचं पाहिला मिळालं. गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य  (Bhagat Singh Koshyari controversial statement) कोश्यारी यांनी केले. त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी, विरोधकांसह राज्यातील सर्वसामान्यांनी खडे बोल सुनावले. कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आला. इतकेच नाही तर राज्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. मुंबई, पुणे, नांदेड, कोल्हापूर, नाशिक, औरांगाबादसह राज्यातील महत्वाच्या शहरात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने निदर्शने केली आहेत. 


राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी राज्यपालांवर सवाल उपस्थित केले आहेत.  राज्यपाल कोश्यारी यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. आजी-माजी मुख्यमंत्र्यांनीही कोश्यारींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार यांच्यासह राज्यातील सर्वच नेत्यांनी राज्यपालाच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. मुंबईतील व्यापाऱ्यांनीही कोश्यारी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर मुंबई, नांदेड, नागपूर, कोल्हापूरसह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्राच्या परंपरेचे भान असणारा व्यक्ती राज्यपाल म्हणून नेमावा, अशी मादणी छत्रपती संभाजीराजे यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत केंद्रात दाद मागणार असल्याचं सांगितलं. त्याशिवाय उप मुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांनी भाजप राज्यपालांच्या वक्तव्याशी अजिबात सहमत नसल्याचं सांगितलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आपल्या खास शब्दात सुनावलं. तर बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी भततसिंग कोश्यारी यांचा राष्ट्रपतींनी तात्काळ राजीनामा घेण्याची लेखी मागणी केली आहे. 


आज सकाळीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध तर केलाच शिवाय शिवसेना फोडून हे सरकार का आणले गेला याचा खुलासाच राज्यपालांनी केला आहे असा देखील आरोप संजय राऊत यांनी केला. त्यामुळे याविरोधात मराठ्या तुलाच उठावे लागेल असं आव्हान देखील केलं. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहिला मिळालं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांच्या वक्तव्याच उत्तर तुम्ही देणार का? असा सवाल उपस्थित केला. तसेच आपण सोमवारी लोकसभेत हा विषय उचलणार असल्याचं देखील म्हंटलं. मागील काही दिवसांपासून भाजपशी संधान साधू इच्छिणाऱ्या मनसेने देखील या वादात उडी घेत थेट राज्यपालांवर निशाणा साधला. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट राज्यपालांना पत्र लिहित उगाचच निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील वातावरण गढूळ न करण्याचा आणि मराठी माणसाला न डिवचण्याचा इशारा दिला. 


राज्यपालांच्या बाजूने कोण?
राज्यपालांच्या या वक्तव्याचा केवळ भाजप आमदार नितेश राणे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सपोर्ट केल्याचं पाहिला मिळालं. प्रकाश आंबेडकरांनी राज्यपाल बोलले ते सत्य बोलले, त्यामुळे त्यांची उचलबांगडी करण्याची गरज नाही अशी थेट मागणी केल्याचं पाहिला मिळालं. तर नितेश राणे यांनी राज्यपाल चुकीचं काही बोललेच नाहीत असं म्हणाले. 


राज्यपाल काय म्हणाले होते?
गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे.  काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचं हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांना नारळ द्या अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे कोश्यारी यांनी ज्यावेळी हे वक्तव्य केलं त्यावेळी स्टेजवर भाजप आमदार नितेश राणे, भारती लव्हेकर आणि खासदार नवनीत राणा देखील उपस्थित होत्या. मात्र राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध न करता राज्यपालांच्या भाषणावर या उपस्थित नेत्यांनी टाळ्या वाजवल्याची बाब समोर आली आहे.