मुंबई : या महिन्याच्या शेवटी मोठा वीकेंड आहे. 28 एप्रिलपासून ते 1 मेपर्यंत सलग चार दिवस सुट्ट्या असल्यामुळे पर्यटनस्थळांवर गर्दी होणार आहे. उन्हाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्रात या वीकेंडमध्ये प्लॅन करता येईल, अशी काही थंड हवेची ठिकाणं आणि सुंदर पर्यटनस्थळं आहेत, जिथे तुम्हाला जाता येईल.


28 एप्रिलला चौथा शनिवार, 29 एप्रिलला रविवार, 30 (सोमवार) एप्रिलला बुद्ध पौर्णिमा आणि 1 मे (मंगळवार) रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे. या चार दिवसात आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही फिरायला जात असाल, तर पैशांची अडचण येऊ नये यासाठी आतापासूनच काळजी घ्या.

मालवण :

कोकणाचं सौंदर्य अनुभवणं हा प्रत्येक पर्यटकासाठी सुखद क्षण असतो. त्यापैकीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण एक आहे. मालवणजवळ असणारे सुंदर समुद्र किनारे आणि निळाशार समुद्र पर्टकांना एक आनंददायी अनुभव देतो. मालवणजवळील भोगवे बीच हा पर्यटकांसाठी चांगला पर्याय आहे.



कोल्हापूर, अंबा घाट : खाद्य संस्कृती अनुभवण्यासाठी कोल्हापूरसारखं दुसरं ठिकाण नाही. कोल्हापूरपासून पुढे कोकणातही जाऊ शकता. मात्र कोकणात जाताना अंबा घाटाजवळ वन विसावा हे रिसॉर्ट आहे, जे निसर्गरम्य वातावरण, शांतता आणि एकांत अनुभवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाताना अंबा घाटात हे रिसॉर्ट आहे.



महाबळेश्वर-पाचगणी : या वीकेंडला तुम्हाला उन्हाच्या झळांपासून स्वतःला वाचवायचं असेल, तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण सुंदर पर्याय आहे. त्याजवळच पाचगणीला देखील तुम्ही जाऊ शकता.



चिखलदरा : देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये विदर्भातील काही शहरं आहेत. मात्र या विदर्भात चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण पर्यटकांसाठी एक पर्वणी आहे.



औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबादला जाण्याचा पर्याय चांगला आहे. शहरातील पानचक्की, बीबी का मकबरा ही ठिकाणं तर आहेतच. शिवाय औरंगाबादपासून जवळच ऐतिहासिक अजिंठा-वेरुळच्या लेण्याही तुम्ही पाहू शकता. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण औरंगाबादपासून 25 किमी अंतरावर आहे.



माथेरान : मुंबईकरांसाठी माथेरान हा चांगला पर्याय आहे. मुंबईपासून साधारणपणे तीन तासांच्या अंतरावर असलेलं हे ठिकाण उन्हाच्या तडाख्यापासून तुमची काही प्रमाणात सुटका करतं आणि पर्यटनाचा चांगला अनुभवही देतं. माथेरानची राणी समजली जाणाऱ्या मिनी ट्रेनचा प्रवासही तुम्ही करु शकता.



लोणावळा : मुंबई आणि पुणेकरांसाठी लोणावळा हे पर्यटनाचं जवळचं ठिकाण आहे. जवळच खंडाळा, लोहगड किल्ला, राजमाची अशी ठिकाणंही पाहता येतात. चार दिवसांचा प्लॅन असेल, तर पुढे महाबळेश्वर किंवा इतर ठिकाणी जातानाही लोणावळ्याला जाणं शक्य आहे.