अमृत मलम बनवणाऱ्या कंपनीच्या संचालकांची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 04 Jun 2018 10:00 AM (IST)
अमृत मलममुळे शैलेश जोशी नाव देशभर पोहोचले होते. अडीअडचणीत असलेल्यांना मदत करण्यास ते सदैव तत्पर असत.
बेळगाव : तरुण उद्योजक आणि अमृत फार्मास्युटिकल्स या कंपनीचे संचालक शैलेश जोशी यांनी आत्महत्या केली. बेळगावच्या विजयनगरमध्ये रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून त्यांनी आयुष्य संपवलं. ते 40 वर्षांचे होते. माजी महापौर कै. शरद जोशी यांचे ते सुपुत्र होते. रविवारी रात्री दीडच्या सुमारास त्यांनी छातीवर गोळी झाडली. गोळीचा आवाज आल्याने शेजारच्यांनी पोलिसांना माहिती दिली. कौटुंबिक कारणामुळे शैलेश जोशी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रसिद्ध अशा अमृत मलमची निर्मिती करणाऱ्या अमृत फार्मास्युटिकल्सचा विस्तार त्यांनी देशभर केला. अमृत मलममुळे त्यांचे नाव देशभर पोहोचले होते. अडीअडचणीत असलेल्यांना मदत करण्यास ते सदैव तत्पर असत. अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचे संबंध होते. शैलेश जोशी यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन आपल्या राजकीय जीवनाची सुरुवातही केली होती.