बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी ही कारवाई केली. अमोल येडगे यांनी कालच गटशिक्षणाधिकाऱ्यांसह 14 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली.
गटसाधन केंद्रातील दहावी आणि बारावीच्या गणित विषयाच्या उत्तरपत्रिकांना शनिवारी रात्री 7.30 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये जवळपास जवळपास 1300 उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. त्यानंतर रविवारी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी गटसाधन केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका सील करून त्या कपाटात ठेवणं गरजेचं होतं, मात्र गटशिक्षणाधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या आगीत उत्तरपत्रिका नष्ट झाल्या. याला जबाबदार धरत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 चे कलम 3 चा भंग केल्याने गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे यांच्यासह 14 जणांना नोटीस बजावली होती.