बीड :  बीडमध्ये एप्रिल महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संखेत मोठी तफावत आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मृत्यूचा आकडा लपवला जातोय का? असा सवाल उपस्थित झाला आहे. 


कोरोना रूग्ण मयत झाला अथवा कोरोनामुक्त झाला, त्यांनी तात्काळ माहिती आयसीएमआरच्या पोर्टलवर अपडेट करणे बंधनकारक आहे. परंतु काही संस्था ती अपडेट करण्यास दुर्लक्ष करतात. असे असले तरी 5 ते 10 मृत्यूचा फरक येऊ शकतो. परंतु या एकाच महिन्यात तब्बल 105 मृत्यूची तफावत आल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.


एप्रिल महिन्यात बीड आणि अंबाजोगाई तालुक्यात 378 रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत तर आरोग्य विभागाकडे फक्त 273 मृतांचीच नोंद आहे. त्यामुळे आता 105 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद का करण्यात आली नाही? याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत..
 
एप्रिल महिन्यात आरोग्य विभागाकडील संस्थानिहाय मृत्यूची नोंद :


स्वाराती अंबाजोगाई 121 


जिल्हा रूग्णालय बीड 115


लोखंडी सावरगाव 8


खाजगी रूग्णालय 15


इतर जिल्ह्यात 6


आगोदरच्या महिन्यातील नोंद 8


एकूण 273 


बीडमध्ये 114 तर अंबाजोगाईत 264 अश्या एकूण 378 रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तर यातील एप्रिल मधल्या 114 रुग्णाच्या मृत्यूची नोंद बीड नगरपरिषदमध्ये करण्यात आली आहे. एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या पाहता भविष्यात त्या रुग्णाच्या कुटुंबीयांना जर सरकारला कोणती मदत घ्यायची असेल अथवा विमा मंजूर करून घ्यायचा असेल आणि त्या मृत व्यक्तीचे नाव जर शासकीय यंत्रणेकडून गहाळ झाले असेल तर ती मदत कशी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे..