Amravati News अमरावती :  अमरावतीच्या (Amravati News) सामाजिक आणि राजकीय वर्तुळात गाजलेल्या राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati shivaji maharaj) पुतळा बसवण्याची जोरदार चर्चा रंगत आहे. त्यामागील एक कारण म्हणजे काल 18 फेब्रुवारीला अवघ्या काही तासात तयार करण्यात आलेला उड्डाणपुलावरील भला मोठा उंचवटा होय. विशेष बाब म्हणजे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी 11 जानेवारी 2022 च्या रात्री कुठलीही परवानगी न घेता यांच ठिकाणी शिवरायांचा पुतळा बसविला होता.


त्यानानंतर महानगरपालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तो अनधिकृत पुतळा पोलीस बंदोबस्तात (Amravati Police) हटवला होता. त्यावरून पालिका प्रशासन आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात मोठा वाद निर्माण होऊन बरेच राजकारण तापले होते. आता पुन्हा त्याच ठिकाणी तयार झालेल्या ओट्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. या प्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित करत अप्रत्यक्षपणे आमदार रवी राणा यांना टोला लगावला आहे. 


पुतळा बसविला म्हणजे मतात परिवर्तन होत नाही


राजापेठ उड्डाणपुलावर जर कोणी शिवरायांचा पुतळा बसवत असेल तर त्यात वाईट काय, पुतळा बसविण्यास कुणाची हरकत असायला कुणाला कुठलेही कारण असायला नको. आपण मंदिर तयार करताना कुणाची परवानगी न घेता बांधतो, तर मग शिवरायांचा पुतळा बिना परवानगी बसविणे त्यात काय नवल आहे. मात्र हे करत असताना शिवरायांच्या नावाने कुणी राजकारण करू नये, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.


शिवरायांच्या पुतळा बसविला म्हणजे मतात परिवर्तन होईल असे होत नसते. राजकीय फायद्यासाठी असं डोकं न लावता ते भक्त आहे, अंध भक्त नाही, असा टोला देखील बच्चू कडू यांनी रवी राणा यांना लगावला आहे. पुढे ते म्हणाले, शिवरायांचा पुतळा बसविणे म्हणजे तो सन्मानानेच बसविला पाहिजे. हल्ली जय श्रीराम लोकांच्या मुखात आहे, तर श्रीराम आमच्या हृदयात आहे. हा दोघांमध्ये फरक असल्याचे देखील बच्चू कडू म्हणले.


पुतळ्याच्या वादावरून तापले होते राजकारण  


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आमदार रवी राणा यांनी स्वतः अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र परवानगी न घेता शिवरायांचा पुतळा बसविण्यात आल्याने अमरावती महानगरपालिकेने तो पुतळा हटवला होता. त्यानंतर रवी राणा यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत जाणीवपूर्वक पुतळा हटवण्यात आल्याचा आरोप केला होता. तर याच कारणावरून तत्कालीन महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती.


या प्रकरणी रवी राणा यांच्यासह 12 ते 13 कार्यकर्त्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर हा वाद अमरावतीमध्ये सलग दोन महिने चालला. सोबतच या उड्डाणपुलावर दोन वर्ष सतत 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच उडानपुलावर ज्या ठिकाणी पूर्वी रवी राणा यांनी पुतळा बसवला होता त्या ठिकाणी उंचवटा तयार करण्यात आल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. 


इतर संबंधित बातम्या