मुंबई : अखेर अयोध्येमधील बहुचर्चित वादग्रस्त जागेबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात निर्णय देताना अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येमध्ये पर्यायी पाच एकर जागा देण्याचा देखील निर्णय सुनावला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर देशभरातील प्रमुख नेतेमंडळी, साधू, मौलवींच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील "आजचा दिवस भारताच्या इतिहासातील सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस असल्याचे म्हटले आहे'


उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासूनच्या वादावर आज पडदा पडला आहे. अखेर आपल्याला न्याय मिळाला आहे. आपण लहानपणापूसन प्रभू श्रीरामाच्या कथा ऐकत होतो. परंतु त्यांचा जन्म कुठे झाला होता? झाला होता की नव्हता? असे प्रश्न उपस्थित केले जायचे. हे वाद आता मिटले आहेत.

उद्धव म्हणाले की, अयोध्येचा निकाल लागल्यानंतर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत आहे. हिंदुत्वाचा आवाज बाळासाहेबांनी बुलंद केला होता. अयोध्येचा प्रश्न संपूर्ण देशभर घेऊन जाणाऱ्या लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचीदेखील आठवण येत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मी आणि हजारो शिवसैनिक आयोध्येला गेलो होतो. सोबत शिवनेरी किल्ल्यावरची मूठभर माती घेऊन गेलो होतो. ती माती अयोध्येत ठेवून आलो. या मातीती एक शक्ती आहे. एका वर्षातच या मातीमूळे चमत्कार घडला आहे. येत्या 24 तारखेला मी पुन्हा अयोध्येला जाणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार आहे.

दोन-तीन दिवसांनी मी पुन्हा शिवनेरी किल्ल्यावर जाऊन त्या मातीला वंदन करणार आहे. आजचा दिवस हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावतील असा आनंद साजरा करु नये. तसेच इतर धर्मियांनी देखील न्यायदेवतेने दिलेला निकाल मान्य करुन आनंदात सहभागी व्हावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

यापुढे मी वारंवार अयोध्येला जाणार आहे. अयोध्येचा प्रश्न ताजा ठेवण्यासाठी कार सेवकांनी हे आंदोलन सुरु ठेवलं होतं. या आंदोलनातील काही कार्यकर्ते अद्याप आहेत, तर काहीजण शहीद झाले आहेत. या सर्वांना मी मनाचा मुजरा करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.