मुंबई : महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक-मालकांचा संप अखेर मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर आम्ही संप मागे घेत असल्याचं ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितलं. ओला, उबेर, बेकायदेशीर टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी ऑटोरिक्षा चालक-मालक संपावर जाणार होते.


महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री यांच्या दालनात स्वतः मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीत आज दुपारी 3 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात बैठकीत ऑटोरिक्षा चालक-मालकांच्या मागण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.

आम्ही मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभारी असून त्यांच्यासोबतच्या बैठकीत आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास असल्याचं मतं शशांक राव यांनी व्यक्त केलं आहे. जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाप्रमाणे आज मध्यरात्रीपासून होणार रिक्षा संप मागे घेतला असल्याचं शशांक राव यांनी सांगितलं.

दरम्यान हकीम समितीच्या शिफारशी तात्काळ सुरु करण्यात याव्या आणि अशा इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारणार होता. या संपात संपूर्ण महाराष्ट्रातील 18 लाख तर मुंबई, नवी मुंबईतील 1 लाख 75 हजार रिक्षा चालक-मालकांचा संपावर जाणार होते. नागपूरसह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, नवी मुंबई याठिकाणी संपाचा मोठा फटका प्रवाशांना बसणार होता.

VIDEO | आज मध्यरात्रीपासून होणारा रिक्षाचालकांचा संप मागे | एबीपी माझा


काय आहेत मागण्या?


- ऑटोरिक्षा चालक मालक संघटनासाठी राज्य सरकारने कल्याणकारी मंडळाची स्थापना केली असून हे महामंडळ परिवहन खात्यातंर्गत असावे.
- विमा कंपनीत भरले जाणारे पैसे विमा कंपनीत न भरता महामंडळात भरावे.
- राज्यात अवैधरित्या होणारी वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक असावं.
- हकीम कमिटीच्या शिफारशीनुसार ऑटोरिक्षाचे भाडे वाढवण्यात यावे.
- ओला, उबेर सारख्या अवैध टॅक्सी कंपन्यांच्या सेवेवर त्वरित बंदी घालावी.
- महाराष्ट्र राज्यात ऑटोरिक्षा विमामध्ये होत असलेली भरमसाठ वाढ तात्काळ कमी करण्यात यावी.