औरंगाबाद : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात (Solapur Barshi) सध्या 'फटे'ची चर्चा आहे. हे प्रकरण विशाल फटे नावाच्या व्यक्तिशी संबंधित आहे. विशाल फटेनं बार्शी आणि सोलापुरातील अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला असून सध्या तो फरार आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींना मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सुरु आहे तर अनेक गोरगरीबांना देखील विशाल फटेनं चुना लावला आहे. फटे स्कॅम चर्चेत असताना औरंगाबादसह मराठवाड्यात 'तीस-तीस स्कॅम'ची चर्चा जोरात आहे. या प्रकरणी एक गुन्हा देखील राठोड नावाच्या व्यक्तीवर दाखल झाला होता. मात्र तो नंतर फिर्यादीनं बॉन्डवर पोलिसांना लिहून देत मागे घेतला. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर राठोड नावाच्या व्यक्तिचं घर पोलिसांनी सील केलं होतं. सध्या हा व्यक्ती औरंगाबादमध्ये दिसत नाही. तर सध्या कुठलाही गुन्हा दाखल नसल्यानं पोलिसांना तपास करण्यात अडचणी येत आहेत. तीस-तीस स्कॅममध्ये फसवणूक झालेल्या लोकांनी पुढे येऊन तक्रार देण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे.
 
'तीस-तीस' घोटाळ्यात पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसात दाखल झाला होता. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला. यातील मुख्य आरोपी संतोष उर्फ सुनील राठोड याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र हा गुन्हा नंतर फिर्यादीनं मागे घेतला. आता राठोड हा औरंगाबादमध्ये दिसून येत नाही, असं सांगितलं जात आहे. 


'तीस-तीस' घोटाळा म्हणजे काय?


औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी ( DMIC ) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं. सुरवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या या तरुणाने पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यातून पैसे आणले जाऊ लागले, ज्यामुळे लोकांमध्ये आपली मार्केटींग करण्यास या तरुणाला यश आले. आणि पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावातील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम या तरुणाने केलं.
 
काही राजकीय नेत्यांनी सुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा विश्वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनी सुद्धा कोट्यावधी रुपये अधिकच्या व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली 10 महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणे अवघड झाले आहे.  त्यामुळं हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होतेय.