औरंगाबाद :  मराठा आंदोलनादरम्यान वाळूज एमआयडीसीत तोडफोड केल्याप्रकरणी आतापर्यंत 41 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून महाराष्ट्र बंदवेळी हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे.


मराठा मोर्चाने पुकारलेल्या 9 ऑगस्टच्या महाराष्ट्र बंदवेळी वाळूज एमआयडीसीमध्ये तोडफोड करणाऱ्यांची धरपकड पोलिसांनी सुरु केली आहे. तसंच आज औरंगाबादचे जिल्हाधिकारी तोडफोड झालेल्या कंपन्यांची पाहणी करण्यासाठी वाळूज भागात दाखल झाले.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली होती. बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन मोर्चाकडून करण्यात आले होते, मात्र तरीही अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले.

औरंगाबादेत तर वाळूजमधील जवळपास 60 कंपन्यांचं नुकसान झालं. औरंगाबादमध्ये बंददरम्यान शेवटच्या टप्प्यात हिंसक वळण लागलं. या हिंसेत वाळूज एमआयडीसीतील 60 कंपन्यांचं मोठं नुकसान झालंय, तर आणखी 10 ते 12 कंपन्यांचंही नुकसान झाल्याची माहिती औरंगाबादमधील उद्योजक संघटनेने दिली.

आंदोलकांनी कंपन्यांमध्ये घुसून मोडतोडही केली. वोक्हार्ड कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला. मायलॉन, स्टरलाईट या कंपन्यांवरही दगडफेक केली. आंदोलकांनी बंद कंपनीच्या गेटवर चढून आत प्रवेश केला. काही कंपनींच्या बंद गेटची चावी सिक्युरिटीकडून काढून घेतली. गेट उघडून कंपनीत प्रवेश केला आणि थेट तोडफोड केल्याचं, कंपनीच्या मालकांनी सांगितलं.

उद्योगांना संरक्षण देण्याची गरज आहे. कंपन्या फोडल्याने मोठं नुकसान झालंय. आमच्या उद्योगांना संरक्षण मिळेल का, नसेल मिळणार तर आम्हालाही गुंतवणूक करण्यावर विचार करावा लागेल, असे उद्योजक संघटनेचे म्हणणे आहे.