औरंगाबाद :  औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनेची जुनी मागणी आहे. मध्यंतरी शासन स्तरावरही विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव पाठवून हालचाली केल्या होत्या. पण आता शासनाच्या जीआरमध्ये औरंगाबादच्या आधी संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे.  औरंगाबादच्या नामांतरासाठी हालचाली सुरु झाल्याचं समोर येतंय. कारण राज्य सरकारच्या जीआरवरच संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आलाय. जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत राम भोगले यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून त्याचा जीआर काढण्यात आलाय. राम भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर आणि औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
औरंगाबाद पुरातन आणि इतिहासाचं वरदान असलेल हे शहर आहे. या शहराच्या अंगाखांद्यावर इतिहासनं आपल्या पाऊलखुणा सोडल्या आहेत. बिवी का मकबरा, पानचक्की, ऐतिहासिक दरवाजे, नहर ए अंबरी अशा एक ना अनेक वास्तूंनी या शहराला सुशोभित केले आहे.  निवडणुका आल्या की,  ऐतिहासिक औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर करण्याचा वलगना  राजकीय व्यासपिठावरून  सुरु होतात. आता तर थेट शासनाच्या जीआरमध्ये संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला  आहे.  पण या शहराचा नावाचा नेमका इतिहास आहे तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.


औरंगाबाद शहराचा नावाचा नेमका इतिहास आहे तरी काय?


मुंबईच्या कान्हेरी गुफांमध्ये एक शिलालेख सापडला होता त्यात औरंगाबादचं नाव 'राजतडक' असल्याचं आढळून आले आहे.  हे नाव कुणी ठेवले त्या नावाचा वास्तिविकतेशी काय संबंध यावर अजूनही प्रकाश पडलेला नाही. या शहराचं नावाजलेलं नाव हे खडकी आहे. हा परिसर बेसॉल्ट खडकावर वसलेला आहे. त्यात शहरात अगदी प्राचीन असे खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याच नावावरून या शहराचे नाव खडकी पडले असावे असं इतिहासात नोंद आहे.


त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता ख-या अर्थानं 'नहरे ए अंबरी' सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारून त्यानं या गावाचं शहर केलं. मात्र  त्यानंही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही.  कालांतरानं 1633 मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्यानं आपल्या नावावरून या शहराचे नाव 'फतेहनगर' असे ठेवले. 1653 मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला. त्यानं पुन्हा या शहराचं नाव फतेहनगरवरुन 'खुजिस्ता बुनियाद' असे ठेवले.  कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आले आणि त्यानंतर या शहराला सध्याचे आहे हे औरंगाबाद हे नाव मिळालं.  ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिले.


काळाच्या ओघात औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी झाली. अजिंठा आणि वेरुळ सारख्या वास्तूंमुळे अगदी जगाच्या कानाकोप-यात औरंगाबादचं नाव दुमदुमलं. मात्र हेच नाव आता बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या. नाव बदलण्यामागं राजकारण हे एकमेव कारण असल्याच अभ्यासक  सांगतात.  हा  प्राचीन काळापासून हा ट्रेन्ड सुरु असल्याचे दाखले ते देतात.



आतापर्यंत शहाराच्या नावामागं शहराशी निगडीत सखोल अभ्यास असायचा. संभाजीनगर नावामागंही काही इतिहास आहे का हे सुद्धा शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यात सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह आहेत . शिवसेना असो वा भाजप मात्र याचा उपयोग  राजकारणासाठी होतो. कदाचित संभाजी महारांच्या याच इतिहासाच्या प्रेमापोटी आता या शहरचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहे. किंवा निवडणुका समोर आल्या म्हणून पुन्हा जुना मुद्दा नवीन करण्याचा प्रयत्न आहे.  मात्र वरवर तरी औरंगजेबाचं नाव या शहराला नको अशीच भूमिका शिवसेना मांडत आहे.


 संभाजी महाराजांचा वध औरंगजेबानं केला आहे. त्यामुळं कदाचित त्या औरंगजेबाचं नाव या शहराला नको असे शिवसेनेला वाटत असावे. काळ बदलला मात्र अजूनही सत्ता बदलली की आपल्या पद्धतीनं नाव बदल्याचा प्रयत्न त्या त्या काळातील राजा करतो हेच यामागील सत्य म्हणावे लागेल. उद्या कदाचीत शिवसेना भाजपची सत्ता बदल्यावर येणा-या नव्या  राजानं पुन्हा आपल्या सोयीनं या शहराचं नाव बदललं तर आश्चर्य वाटायला नको.