औरंगाबाद : बनवाट रहिवासी प्रमाणपत्र आणि डोमिसाईल सर्टिफिकेटच्या मदतीनं लष्करात दाखल होण्याचा प्रयत्न करणाऱ्या 37 तरुणांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे.


गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात औरंगाबादमध्ये झालेल्या लष्कर भरती मेळाव्यात हजारो तरुण सहभागी झाले होते. 37 उमेदवारांनी औरंगाबाद, वैजापूर, धुळे, चाळीसगाव, साक्री अशा ठिकाणच्या तहसील कार्यालयांचे रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर केला होता.

या कागदपत्रांविषयी शंका वाटत असल्याने कॅप्टन मोहनपाल सिंग यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन तक्रार दिली होती.

त्या तरुणांनी दाखल केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी सैन्यभरती अधिकाऱ्यांनी केली. पडताळणीदरम्यान 37 उमेदवारांची कागदपत्रं बनावट असल्याचं उघड झालं. औरंगाबादमधील छावणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून सर्व जण सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.