औरंगाबादमधील कचरा प्रश्नाला हिंसक वळण, ग्रामस्थांकडून पोलिसांवर दगडफेक
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 07 Mar 2018 04:16 PM (IST)
औरंगाबादेतील कचरा प्रश्नाला हिंसक वळण लागलं आहे. मिटमिटा आणि पडेगावांमध्ये कचऱ्याच्या गाड्यांवर स्थानिकांनी तुफान दगडफेक केली. तसेच दोन गाड्यांची तोडफोड केली तर काही गाड्आ पेटवून दिल्या आहेत.
औरंगाबाद : औरंगाबादेतील कचरा प्रश्नाला हिंसक वळण लागलं आहे. मिटमिटा आणि पडेगावांमध्ये कचऱ्याच्या गाड्यांवर स्थानिकांनी तुफान दगडफेक केली. तसेच दोन गाड्यांची तोडफोड केली तर काही गाड्या पेटवून दिल्या आहेत. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. या दगडफेकीत 5 ते 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे औरंगाबाद महापालिकेनं आप्पेवाडी गावात कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. पोलीस संरक्षणात पालिकेच्या गाड्या पोहोचल्या मात्र स्थानिकांनी पोलिसांच्याही गाड्या अडवल्या. त्यामुळे गावात काहीकाळ गोंधळ झाला. तर गंधेली ग्रामस्थांनी चक्क रस्ताच उखडला. औरंगाबाद-बीड हायवेपासून 4 किलोमीटर अंतरावर गंधेली हे गाव आहे. या गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरात दगडखाणी आहेत. या खदाणीत महानगरपालिकेने कचरा टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ग्रामस्थांनी कावेबाजी करत आपल्या गावात जाणारा रास्तच उखडून टाकला. गेल्या 20 दिवसांपासून औरंगाबादमध्ये कचरा कोंडी सुरु आहे. याप्रश्नावरुन काल (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलली यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. संबंधित बातम्या : डम्पिंग ग्राऊंडसाठी जमीन देणार नाही: मुख्यमंत्री 18व्या दिवशीही औरंगाबादमधील कचराकोंडी कायम औरंगाबादेतील कचराकोंडीचा 17 वा दिवस, आमदार सावेंची गाडी अडवली औरंगाबादचा कचरा, गावकऱ्यांनी कचऱ्याची गाडी फोडली कचराप्रश्न पेटलेल्या औरंगाबादेतील दोन चकचकीत वॉर्ड