औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील कचराकोंडीचा आज 17 वा दिवस आहे. मात्र अजूनही हा प्रश्न निकाली निघालेला नाही. नारेगावातील ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे औरंगाबादेत अभूतपूर्व कचराकोंडी झाली आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं साम्राज्य औरंगाबादमध्ये पसरलं आहे.
दरम्यान औरंगाबादेतील कचराकोंडीच्या पार्श्वभूमीवर आज तिसगाव गोलवाडी या गावातील लोकांनी आमदार अतुल सावे यांची गाडी अडवली आणि आमच्या भागात कचरा टाकू देणार नाही असा पवित्रा घेतला. विशेष म्हणजे आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासनावर काल मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास कचऱ्याच्या काही गाड्या रिकाम्या करण्याची वेळ आली.
औरंगाबाद शहरातील कचरा आधी नारेगावच्या डेपोत टाकला जायचा, मात्र नारेगावच्या ग्रामस्थांनी याला विरोध करत कचरा टाकू देण्यास विरोध केला. त्यानंतर अद्याप औरंगाबाद महापालिकेला दुसरी पर्यायी जागा शोधण्यात यश आलेलं नाही.